Raghav Chadha on AAP Allegations
नवी दिल्ली :
राघव चढ्ढा विरुद्ध 'आप': आम आदमी पार्टीचे (आप) राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांनी त्यांच्याच पक्षातील अशा नेत्यांवर जोरदार निशाणा साधला आहे, ज्यांनी अलीकडेच त्यांच्याविरुद्ध आघाडी उघडली होती. वास्तविक, गेल्या काही दिवसांपासून 'आप'चे काही नेते सोशल मीडियावर व्हिडिओ जारी करून राघव चढ्ढा संसदेत पंजाबचे प्रश्न मांडण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करत होते. याला उत्तर म्हणून राघव चढ्ढा यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडल 'एक्स' (X) वर सुमारे ३ मिनिटांचा एक व्हिडिओ शेअर करत आपवर पलटवार केला आहे.
रविवारी जारी केलेल्या निवेदनात चढ्ढा म्हणाले, "आम आदमी पक्षाच्या काही नेत्यांकडून माझ्यावर जे निराधार आणि द्वेषपूर्ण आरोप केले जात आहेत की, मी संसदेत पंजाबचे प्रश्न मांडले नाहीत, ते मी पूर्णपणे फेटाळतो. दरम्यान, नुकतेच पक्षाचने राघव चढ्ढा यांना राज्यसभेतील पक्षाच्या उपनेतेपदावरून हटवले होते. त्यांच्या जागी अशोक मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
"ज्यांनी कोणी संसदेचे कामकाज पाहिले आहे, त्यांना सत्य माहित आहे. खासदार म्हणून माझ्या कार्यकाळात मी सातत्याने, वारंवार आणि जोरकसपणे सभागृहात पंजाबचे प्रश्न मांडले आहेत. ही काही मते, प्रचाराची बाब किंवा राजकीय सोयीची गोष्ट नाही. हा अधिकृत रेकॉर्डचा भाग आहे, जो कोणताही नागरिक तपासू शकतो," असेही त्यांनी पुढे नमूद केले.
राघव चढ्ढा यांच्यावर करण्यात आलेल्या प्रमुख आरोपांपैकी एक म्हणजे केंद्राकडे प्रलंबित असलेल्या पंजाबच्या निधीबाबत त्यांनी आवाज उठवला नाही. हे आरोप फेटाळून लावण्यासाठी त्यांनी २०२४ मध्ये राज्यसभेत या मागणीसाठी आवाज उठवल्याचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.याव्यतिरिक्त, त्यांनी संसदेच्या पटलावर पंजाबशी संबंधित अनेक प्रश्न उपस्थित केल्याची यादी दिली आहे, ज्यात खालील प्रमुख विषयांचा समावेश आहे.
प्रलंबित आरडीएफ (RDF) निधीचे वाटप, भूजल पातळी खालावल्याचे संकट, शेतकर्यांवरील संकट,पंजाब सरकारवर होणारा आर्थिक अन्याय. राज्यातील वाढत्या अमली पदार्थांच्या वापर, सीमेवरील राज्याची सुरक्षा वाढवणे,करतारपूर साहिब कॉरिडॉरचा विस्तार, नानकाना साहिबसाठी व्हिसा-मुक्त तीर्थयात्रा आणि इतर अनेक मुद्दे असल्याचा दावा त्यांनी केला आहे. "पंजाब माझ्यासाठी केवळ चर्चेचा विषय नाही, तर ती माझी बांधिलकी आहे. तो माझ्या आत्म्याचा भाग आहे. मी नेहमीच पंजाबच्या हक्कांसाठी उभा राहिलो आहे आणि यापुढेही प्रामाणिकपणे, धैर्याने आणि निष्ठेने हे कार्य सुरू ठेवीन," असे 'आप' खासदारांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.