

Raghav Chadha AAP Reaction: आम आदमी पार्टीने (AAP) केलेल्या कारवाईनंतर राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाने त्यांना राज्यसभेतील डेप्युटी लीडर पदावरून हटवल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडिओ शेअर केला, जो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
राघव चड्ढा यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की, “माझ्या शांततेला माझा पराभव समजू नका. मला शांत करण्यात आले आहे, पण मी हरलो नाही.” गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या शांततेबाबत आणि पक्षातील भूमिकेबाबत चर्चा सुरू होती, त्यावर त्यांनी या व्हिडिओतून उत्तर दिले.
चड्ढा यांनी गंभीर आरोप करत सांगितले की, पक्षाने संसदेत त्यांना बोलण्याची संधी न देण्याबाबत सांगितलं आहे. “मी जेव्हा बोलतो, तेव्हा सामान्य माणसाचे प्रश्न मांडतो. मग मला बोलण्यापासून का रोखलं जात आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
राघव चड्ढा यांनी आपल्या भाषणांमध्ये उचललेल्या मुद्द्यांचा उल्लेख करत सांगितले की, त्यांनी महागाई, डिलिव्हरी बॉयजच्या समस्या, अन्नातील भेसळ, टोल प्लाझा, बँक चार्जेस आणि टेलिकॉम कंपन्यांच्या धोरणांवर सातत्याने आवाज उठवला.
त्यांच्या मते, या मुद्द्यांमुळे सामान्य नागरिकांना फायदा झाला, पण त्यासाठी त्यांना बोलण्यापासून रोखले जात आहे, हे आश्चर्यकारक आहे.
चड्ढा यांनी जनतेला उद्देशून म्हटले की, “तुम्ही मला दिलेलं प्रेम आणि पाठिंबा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. माझी साथ सोडू नका. मी तुमच्यासाठीच काम करतो.”
व्हिडिओच्या शेवटी त्यांनी ठामपणे सांगितले, “मेरी खामोशी को मेरी हार मत समझ लेना. मैं वो दरिया हूं, जो वक्त आने पर सैलाब बनता है. जय हिंद.” या वक्तव्यामुळे त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत आणि पुढील रणनीतीबाबत नवी चर्चा सुरू झाली आहे. AAPमधील या घडामोडींमुळे पक्षाच्या अंतर्गत राजकारणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राघव चड्ढा यांच्या प्रतिक्रियेमुळे पुढील काळात पक्षात आणखी बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.