Daughter Killed Mother: झारखंडची राजधानी रांचीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका ५० वर्षाच्या महिलेच्या हत्या प्रकरणी तिच्या पोटच्या अल्पवयीन मुलीला अटक करण्यात आली आहे. याचबरोबर या अल्पवयीन मुलीच्या बॉयफ्रेंडसह दोन जणांना देखील ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीने आपल्या आईची हत्या पैशावरून झालेल्या वादानंतर केली. यासाठी बॉयफ्रेंड आणि त्याच्या मित्रांची मदत घेण्यात आली.
मृत महिलेची ओळख ही नाहिदा परवीन अशी सांगण्यात आली आहे. त्या रांचीच्या डोरंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मनीटोला भागात रहात होत्या. त्यांच्या हत्येचा प्रकरण २७ एप्रिल रोजी समोर आलं होतं. त्यांची हत्या २४ एप्रिल रोजी करण्यात आली होती.
रांची शहर एसपी पारस राणा यांनी सांगितलं की, २६ एप्रिलला मृत महिलेच्या दीराने एक लेखी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत संबंधित महिलेच्या मृत्यू संशयास्पद वाटतोय असं लिहिलं गेलं होतं. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली. तपासात अनेक गोष्टींचा उलगडा झाला अन् पोलिसांनी बिहारमधील गया जिल्ह्यातील दोन लोकांना अटक केली. यात अल्पवयीन मुलगी आणि तिचा कथित बॉयफ्रेंड अरबाज खान याचा देखील समावेश होता.
तपासादरम्यान पोलिसांना धक्कादायक माहिती समजली. अल्पवयीन मुलीने आपला गुन्हा कबूल केला आहे. तिने सांगितले की मी आईकडून पैसे मागत होते. मात्र आईने पैसे देण्यास नकार दिला होता. अल्पवयीन मुलगी आपल्या बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार होती. त्याच्यावर तिने मोठा पैसा खर्च केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीने आपल्या बॉयफ्रेंडला आधीच पाच लाख रूपये दिले होते.
ज्यावेळी आईला याची माहिती मिळाली तिने पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर मुलीने आपल्या बॉयफ्रेंड आणि त्याच्या तीन मित्रांसोबत मिळून आईचीच हत्या करण्याचा कट रचला. २४ एप्रिल रोजी सर्वांनी मिळून नाहिदा परवीनला उशीने तोंड दाबून खून केला. यानंतर दोन दिवसांनी २६ एप्रिल रोजी मृतदेह डोरंडाच्या एका कब्रिस्तानमध्ये दफन केला.
मंगळवारी पोलिसांनी मॅजिस्ट्रेटच्या उपस्थितीत पुन्हा कबर खोदली अन् नाहिदा यांचा मृतदेह बाहेर काढला. तपासात मृत नाहिदा यांच्या गळ्यावर जखमेचे व्रण आढळून आले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाटी पाठवण्यात आला.
पोलिसांनी सांगितलं की या प्रकरणाचा तपास सुरू असून या हत्येत सामील असलेल्या इतर आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेमुळं संपूर्ण भागातील लोकांना धक्का बसला आहे.