पुढारी ऑनलाईन डेस्क : "मी विनोदाच्या माध्यमातून जेव्हा लोकांना हसवतो त्यावेळी राजकीय आणि सामाजिक भूमिकाच मांडतो. तुम्हाला जर चिखल साफ करायचा असेल तर त्यामध्ये उतरावेच लागेल. त्यामुळे मी राजकारणात आलो आहे", अशा शब्दात राजकारणात प्रवेश करताना पंजाबमधील आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान यांनी आपली भूमिका मांडली होती. एक कॉमेडीयन म्हणून आपली कारर्कीद सुरु केलेला हा अभिनेता आज देशातील प्रगत राज्य पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहे. ( Bhagwant Mann )
भगवंत मान यांचा जन्म १७ ऑक्टोबर १९७३मध्ये पंजाबमधील संगरुर जिल्ह्यातील सतोज गावामध्ये झाला. त्यांनी संगरुरमधील 'एसयुएस' कॉलेजमध्ये बीकॉमपर्यंत शिक्षण घेतलं. कॉलेजमध्ये त्यांनी हास्य स्पर्धांमध्ये बाजी मारली. तसेच कविता स्पर्धाही गाजवल्या. त्यानंतर ते पूर्णवेळ कॉमेडियन झाले. १९९४ ते २०१५पर्यंत त्यांनी पंजाबी आणि हिंदी चित्रपटांसह जाहिरात क्षेत्रातही काम केले.
घरामध्ये त्यांना जुगनू नावाने हाक मारली जाते. "हा मुलगा अंधारातही एक आशेचा किरण आहे. म्हणूनच आम्ही त्याला जुगून नावाने हाक मारतो", असे त्यांची आई अभिमानाने सांगते. भगवंत मान यांचा विवाह इंद्रप्रीत कौर यांच्याशी झाला. त्यांना एक मुलगा, मुलगी अशी दोन अपत्य आहेत. २०१५मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. सध्या त्यांची पत्नी मुलांसह अमेरिकेत वास्तव्याला आहे.
भगवंत मान यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात मनप्रीत सिह बादल यांच्या पंजाब पीपल्स पार्टीमधून केली. २०१२ मध्ये त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली. मात्र त्याचा पराभव झाला. या निवडणुकीनंतर मनप्रीत सिंह बादल यांनीच काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तर भगवंत मान यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला. २०१४ मध्ये त्यांनी संगरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि तब्बल २ लाख मतांनी ही निवडणूक जिंकलीही. यानंतर पंजाबमध्ये 'आप' म्हणजे भगवतं मान असे समीकरणच बनलं. ते पक्षाचे स्टार प्रचारकही झाले. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी 'आप'च्या तिकिटावर जलालाबादमधून सुखबीर बादल यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा पराभव झाला. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत ते पुन्हा एकदा एक लाखांहून अधिक मतांनी विजय झाले हाेते.
पंजाबमधील माणूस म्हटलं की, सारं काही दिलखुलास. जोरजोरात बोलणे, पहडी हसणं आणि प्रश्न कोणताही असो दिलखुलासपणे आपलं मत मांडणे. राजकारणात भगवंत मान अल्पावधीत यशस्वी झाले त्यामागील महत्वाचे कारण म्हणजे त्यांची लोकांबरोबर संवाद साधण्याची हातोटी. हा नेता प्रचंड ऊर्जावान आहे. तो लोकांशी दिलखुलासपणे संवाद साधतो, अशी त्यांची ओळख बनली आहे. त्यांना लिखाणाची आवड आहे. ते कवीदेखील आहे. स्पोर्टसमध्ये त्यांना विशेष रुची आहे. यंदाच्या निवडणुकीत संपूर्ण पंजाबमध्ये त्यांच्या व्यक्तिमत्वाचा करिष्मा दिसत होता. दिल्लीमध्ये जशी अरविंद केजरीवाल यांची ओळख आहे. तशीस पंजाबमध्ये स्वत:ची ओळख बनविण्यात भगवंत मान यशस्वी ठरले. या आश्वासक नेतृत्वामुळेच जनतेने आम आदमी पार्टीला भरभरुन कौल दिल्याचे चित्र आहे.
मागील काही वर्ष भगवंत मान यांना असणार्या दारुच्या व्यसनाची चर्चा होत होती. संसदेमध्ये ते दारुच्या नशेत असताना आले होते, असा आरोप भाजपच्या खासदारांनी केला होता. २०१६ मध्ये गायक मनमित अलिशे याची हत्या झाली. त्याच्या अंत्यसंस्कारावेळीही मान यांनी मद्यसेवन केले होते, असा आरोप झाला होता. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दारुच्या नशेत असलेले त्यांचे अनेक व्हिडीओ साेशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. १ जानेवारी २०१९ मध्ये भगवंत मान यांनी बरनाला येथे एक जाहीर सभेत, "यापुढे दारुच्या थेंबालाही स्पर्श करणार नाही", अशी शपथ घेतली होती.
भगवंत मान हे कॉमेडी शोमध्ये राजकीय नेत्यांची नक्कल करत असत. यातून ते राजकीय व सामजिक मुद्यांवरही भाष्य करत. एकेकाळी राज्यातील राजकीय नेत्यांनी नक्कल करणारा हा कलाकार आता पंजाबच्या राजकारणातील सर्वोच्च पदावर विराजमान होणार आहे.
हेही वाचलं का?