नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा युक्रेनची राजधानी कीव्हवर रशियन सैन्याने हल्ला सुरूच ठेवले आहेत. युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या सुरक्षा सज्जतेचा आणि सध्याच्या जागतिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे देखील उपस्थित होते. या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि इतर वरिष्ठ अधिकारीही सहभागी झाले होते.
यापूर्वी २८ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली होती. या बैठकीत पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, "भारत युद्धात अडकलेल्या शेजारी आणि विकसनशील देशांच्या लोकांना मदत करत राहील. सध्या सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धामुळे भारतीय नागरिक तेथे अडकून पडले होते, त्यात बहुतांश विद्यार्थी होते. त्यांना या ठिकाणाहून बाहेर काढण्यासाठी भारताने 'ऑपरेशन गंगा अभियान' सुरू आहे".
'ऑपरेशन गंगा' मिशन अंतर्गत भारताने आपल्या सुमारे 19,000 नागरिकांना परत आणले आहे. रशिया युक्रेनच्या विविध शहरांना सतत लक्ष्य करत आहे. बॉम्ब शेल आणि क्षेपणास्त्रे डागली जात आहेत. आजूबाजूच्या भागावर वर्चस्व मिळवल्यानंतर, रशियन सैन्य युक्रेनची राजधानी कीव्हवर वर्चस्व राखण्यासाठी येथे जमा झाली आहे आणि कीव्हवर एकसारखा तोफांचा मारा सुरूच ठेवला आहे.
हेही वाचलं का?