नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : बांगलादेशात हिंदूंची घरे, दुकाने, कार्यालये, व्यावसायिक प्रतिष्ठाने, महिला, मुले आणि अगदी मंदिरे आणि गुरुद्वारा, श्रद्धा केंद्रेही सुरक्षित नाहीत. ही स्थिती चिंताजनक असून अल्पसंख्याकांच्या सुरक्षेसाठी आणि मानवी हक्कांसाठी प्रभावी पावले उचलणे ही जागतिक समुदायाची जबाबदारी आहे. बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या रक्षणासाठी भारत सरकारने शक्य ती सर्व पावले उचलावीत, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आणि ज्येष्ठ वकील आलोक कुमार यांनी केले आहे. (Alok Kumar)
आज (दि. ६) एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना ते म्हणाले की, आपला शेजारी बांगलादेश एका विचित्र अनिश्चिततेत, हिंसाचाराच्या आणि अराजकात अडकला आहे. हसीना सरकारने राजीनामा दिल्यानंतर आणि त्यांनी देश सोडल्यानंतर अंतरिम सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरू आहे. संकटाच्या या काळात भारत बांगलादेशच्या संपूर्ण समाजाचा मित्र म्हणून खंबीरपणे उभा आहे. (Alok Kumar)
ते पुढे म्हणाले की, अलीकडच्या काळात बांगलादेशमध्ये हिंदू, शीख आणि इतर अल्पसंख्याकांच्या धार्मिक स्थळे, व्यावसायिक प्रतिष्ठान आणि घरांचेही नुकसान झाले आहे. पंचगड जिल्ह्यातील २२ घरे, झीनैदाह मध्ये २० घरे आणि जेसोरमध्ये २२ दुकाने कट्टरपंथीयांचे लक्ष्य बनली आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये स्मशानभूमीचीही तोडफोड करण्यात आली आहे. मंदिरे आणि गुरुद्वारांचेही नुकसान झाले आहे. बांगलादेशातील हिंदूंची संख्या एकेकाळी 32 टक्के होती, आता ते 8 टक्केपेक्षा कमी झाली आहे. (Alok Kumar)
बांगलादेशच्या अराजकेतच्या पार्श्वभूमीवर सीमेपलीकडून घुसखोरीचा मोठा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्या सुरक्षा दलांनी सीमेवर कडक नजर ठेवणे आणि कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण होऊ न देणे आवश्यक आहे. बांगलादेशमध्ये लवकरात लवकर लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष सरकार पुन्हा स्थापन व्हावे, अशी आमची इच्छा आहे, असे ते म्हणाले.