Heatwave alert 2026
नवी दिल्ली : यंदाचा उन्हाळ्यात भारतीयांना कडाक्याच्या उष्णतेचा सामना करावा लागणार आहे. मार्च ते जून या कालावधीत देशातील तापमान सामान्यपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त राहण्याची शक्यता हवामान अभ्यासातून वर्तवण्यात आली आहे. फेब्रुवारीमध्ये कमी थंडीच्या काळात अचानक उष्णतेत झालेल्या वाढीमुळे हा परिणाम आधीच स्पष्ट झाला आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीसह अनेक प्रमुख शहरांमध्ये तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या जवळ पोहोचले आहे. मार्च आणि एप्रिलमध्ये उष्णता तीव्र होण्याची अपेक्षा आहे.२०२६ मध्ये देशातील बहुतांश भागात केवळ दिवसाचेच नव्हे, तर रात्रीचे तापमानही वाढलेले असेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
हवामान खात्यानुसार, निसर्गाच्या चक्रात वेगाने बदल होत असून त्याचे परिणाम आता स्पष्टपणे दिसू लागले आहेत. हवामान बदलामुळे यंदा फेब्रुवारी महिन्यातच थंडी गायब झाली. तसेच अचानक उष्णता वाढू लागली आहे. आता दिवसासोबतच रात्रीचे तापमानही सरासरीपेक्षा जास्त नोंदवले जात आहे. येत्या मार्च आणि एप्रिल महिन्यात नेहमीपेक्षा जास्त उष्णता जाणवेल. उन्हाळ्याची सुरुवात यंदा लवकर आणि तीव्र होणार आहे. मे आणि जून महिन्यात देशाच्या उत्तर-पश्चिम, मध्य आणि पूर्व भागात 'उष्णतेच्या लाटा' (Heat Waves) येण्याचे प्रमाण वाढणार आहे. यामुळे दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे कठीण होऊ शकते. उन्हाचा कडाका वाढत असतानाच, काही राज्यांमध्ये ४ ते ७ दिवस नेहमीपेक्षा जास्त पाऊस किंवा ढगाळ वातावरण राहू शकते. यामुळे उन्हाळ्यात काही काळ आर्द्रता वाढण्याची शक्यता आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये भारतात उष्णतेने सातत्याने विक्रम मोडले आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMD) नुसार, १९०१ मध्ये रेकॉर्ड सुरू झाल्यापासूनची सर्वात उष्ण वर्षे प्रामुख्याने अलिकडच्या दशकांमध्ये आली आहेत. ला निनाच्या प्रभावामुळे, २०१६-२०२५ हे दशक रेकॉर्डवरील सर्वात उष्ण दशक होते. गेल्या दशकात, २०२४ मध्ये राजस्थानमध्ये दीर्घकाळ उष्णतेची लाट आणि ५०°C पेक्षा जास्त तापमान दिसून आले.
गेल्या १०० वर्षांत भारताचे सरासरी तापमान सुमारे ०.८°C ने वाढले आहे. आकडेवारीच्या दृष्टीने हे खूप अल्प दिसत असली तरी तिचे प्रचंड मोठे परिणाम दिसत आहेत. जागतिक तापमानवाढीमुळे आता हिवाळा लवकर संपतो आणि उन्हाळा जास्त काळ टिकतो. पूर्वी जाणवणारा आल्हाददायक 'वसंत ऋतू'च हळूहळू नाहीसा होत असल्याचे चित्र आहे.
शहरांमध्ये झाडे कमी आणि सिमेंट-काँक्रीटच्या इमारती जास्त आहेत. या इमारती दिवसा सूर्याची उष्णता शोषून घेतात आणि रात्री ती बाहेर सोडतात. यामुळे रात्रीसुद्धा हवेत गारवा जाणवत नाही. यालाच 'हीट आयलंड' परिणाम म्हणतात, ज्यामुळे शहरात तापमान नेहमीपेक्षा १५ ते २० अंश सेल्सिअसने जास्त वाढू शकते. यंदा आकाशात ढग कमी आहेत आणि पाऊस किंवा बर्फवृष्टीही कमी झाली आहे. यामुळे सूर्याची किरणे थेट जमिनीवर पडत असून जमीन वेगाने तापत आहे.पश्चिमेकडील विक्षोभ (Western Disturbances): हवामानातील बदलांमुळे पश्चिमेकडून येणारे थंड वारे कमी झाले आहेत, परिणामी आकाश निरभ्र राहून उन्हाचा चटका अधिक तीव्र जाणवत आहे.
प्रशांत महासागरातील मिठाच्या (क्षारतेच्या) बदल्यात असलेल्या प्रमाणामुळे 'अल निनो'चा प्रभाव अधिक शक्तिशाली होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचा थेट परिणाम भारताच्या आगामी मान्सूनवर होऊ शकतो, असा इशारा ाज्या संशोधनातून देण्यात आला आहे. 'जियोफिजिकल रिसर्च लेटर्स' या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या ड्युक युनिव्हर्सिटीच्या निकोलस स्कूल ऑफ एन्व्हायर्नमेंटच्या संशोधनानुसार, प्रशांत महासागरातील क्षारांचा विशिष्ट पॅटर्न अल निनोची तीव्रता सुमारे २० टक्क्यांपर्यंत वाढवू शकतो. इतकेच नव्हे तर, यामुळे अति-तीव्र अल निनोच्या घटनांची शक्यता दुप्पट होऊ शकते. सागरी प्रवाहांच्या या बदलांमुळे जागतिक हवामान चक्रात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. महासागरातील कमी किंवा जास्त क्षारतेचे प्रवाह अल निनोसारख्या हवामानविषयक घटनांवर मोठा प्रभाव टाकतात.अल निनो अधिक सक्रिय झाल्यामुळे भारतात मान्सून कमकुवत राहण्याची दाट शक्यता आहे.यामुळे देशात पावसाचे प्रमाण घटून दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होऊ शकते.
राज्यात थंडी संपण्यापूर्वीच उन्हाचा कडाका वाढू लागला आहे. बुधवारी राजस्थानमधील बारमेरमध्ये तापमान ३६.३ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, तसेच राज्यातील तब्बल २४ शहरांमध्ये दिवसाचे तापमान ३० अंशांच्या पुढे गेले आहे. हे तापमान सरासरीपेक्षा ६ अंशांनी जास्त आहे. तसेच रात्रीचा गारवा देखील कमी झाला आहे. राज्यातील किमान तापमान २० अंशांवर पोहोचले असून, अनेक ठिकाणी ते १५ अंशांपेक्षा जास्त नोंदवले जात आहे.हवामान केंद्राच्या म्हणण्यानुसार, येत्या ७ दिवसांत पाऊस पडण्याची शक्यता नाही, हवामान पूर्णपणे कोरडे राहील. यामुळे दिवसा आणि रात्रीच्या तापमानात आणखी २ अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे.