सिन्नर : सार्वजनिक विहीरीला असलेले पाणी  
Latest

नाशिक : पाणीटंचाईने वैतागल्या अन् ग्रामपंचायतीवर मोर्चा काढत महिलांनी मांडला ठिय्या

अंजली राऊत

घोटी (ता. इगतपुरी, जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील सोनोशी येथे गेल्या तीन-चार महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी अनेकवेळा ग्रामपंचायत व प्रशासनाकडे मागणी केली होती. मात्र पाणी प्रश्नाकडे कोणीही लक्ष दिलेले नाही. परिणामी सोमवारी (दि. १३) संतप्त महिलांसह ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केले.

साद्यस्थितीत सोनोशी ग्रामपंचायतीवर प्रशासकराज असून, प्रशासक व माजी सरपंच यांनी पाणी प्रश्नाकडे गांभीयनि लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी पंचायत समिती स्तरावर केली आहे. सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेची विहीर माजी सरपंच वाळू धोंगडे यांच्या मालकीच्या गटात असून, विहिरीची जागा दानपत्र, बक्षीसपत्र करून गावासाठी दिलेली आहे. या विहिरीला मुबलक पाणी असून, रातोरात पाणी गायब होत असल्याने टंचाईचा सामना करावा लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. दुसरीकडे गावच्या विहिरींनी तळ गाठला असून, गावाला टँकरने पाणीपुरवठा होत आहे, असे माजी सरपंच ताई पोटकुले यांचे म्हणणे आहे.

सोनोशी : ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करताना महिला, तरुण, ग्रामस्थ

येत्या आठ दिवसांत पाणी प्रश्न सुटला नाही, तर जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार करण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते गणपत पेढेकर, तुपार पेढेकर, खंडू भांगरे, सचिन घोंगडे, माधव घाणे, लालमन भांडकोळी, दीपक धोंगडे, आकाश धोंगडे, सीताराम खोडे, वसंत पेवेकर, सचिन धोंगडे, रामदास पेढेकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

टँकरचे मिळतात केवळ चार हंडे
ग्रामस्थांना सध्या टँकरने पाणीपुरवठा होत असून, प्रत्येक कुटुंबाला केवळ चार ते पाच हंडे पाणी मिळत आहे. गावच्या विहिरीला पाणी असूनही ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यावाचून वंचित राहावे लागत आहे. परिणामी ग्रामस्थांना टँकरच्या साहाय्याने किया उन्हातान्हात भटकंती करत पाण्याच्या शोधार्थ रानोमाळ हिंडावे लागत आहे.

ग्रामसेवक म्हणतात… आंदोलन करा
सार्वजनिक पाणी योजनेच्या विहिरीतील तीनपैकी एक मोटार काढावी व संबंधित पाइपलाइन तपासून गावाला पाणीपुरवठा नियमित करावा, अशी मागणी होत आहे. आंदोलन करा अथवा उपोषणाला बसा, मगच गावचा पाणी प्रश्न सुटेल, असे सूचक वक्तव्य ग्रामसेवक कुंडलिक राऊत यांनी ग्रामस्थांना फोनवर दिले. त्यानंतर सोमवारी (दि. १३) गावातील महिला, ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर मोर्चाद्वारे ठिय्या आंदोलन केले.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT