नागपूर, पुढारी वृत्तसेवा : वेस्टर्न कोल फिल्ड्सने आपल्या खाणींमधून युध्दस्तरावर कोळसा उत्पादन वाढवावे. सुमारे २० दशलक्ष टन कोळसा उत्पादन वाढणे आवश्यक आहे. आजच्या स्थितीत कोळसा उपलब्ध नसल्यामुळे भारनियमनाचा सामना करावा लागत आहे. हे लक्षात घेऊन वेकोलिने वीजनिर्मितीसाठी लागणारा कोळसा राखीव ठेवावा, असे आवाहन केंद्रीय रस्ते महामार्ग वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात बोलताना केले.
वेस्टर्न कोल फिल्डसच्या सीएसआर (सामााजिक जबाबदारी) निधीतून दिव्यांगांना विविध साहित्य वाटप शिबिराचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाला खासदार कृपाल तुमाने, आमदार आशिष जयस्वाल व अलियावर जंग संस्थेचे अरुण वनिक, वेकोलिचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार उपस्थित होते.
ज्या कोळसा खाणी बंद आहेत किंवा आर्थिक अडचणीत आहेत. त्या कोळसा खाणी सुरु करण्यासाठी खाजगीकरणाचा वापर करून पाहावा, असे सांगताना गडकरी म्हणाले की, शासनाने कोळसा कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. अमोनियम नायट्रेटचा तुटवडा आपल्या देशात आहे. वेकोलिने अमोनियम नायट्रेट व मिथेनचे उत्पादन करण्याची परवानगी द्यावी. यासोबतच डीएमई बनविले, तर घरगुती वापरासाठी गॅसमध्ये ते मिसळता येईल. व सिलिंडरचा दर स्वस्त होईल. तसेच खाणींमधून निघालेल्या मातीतून रेती वेगळी करून ती स्वस्त किमतीत उपलब्ध करून दिली. तर गरिबांचा फायदा होईल आणि रेती माफियांचा काळा बाजार नियंत्रणात राहील.
बांधकाम क्षेत्रात वापरण्यात येणार्या मशिनरींसाठीही आपण युरो-६ ची अट आणणार आहे. त्यामुळे इथेनॉल, मिथेनॉल, सीएनजी, एलएनजीचा वापर करता येणार आहे. यामुळे पर्यावरणाचे रक्षणही करणे शक्य होईल, याकडे लक्ष वेधून गडकरी म्हणाले की, वेकोलिने आपल्या रिकाम्या जागा, टेकड्या सामाजिक संघटनांना वृक्षारोपणासाठी उपलब्ध करून द्याव्यात. तसेच कर्मचार्यांसाठी स्मार्ट घरे बांधून त्यांनाही चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्या म्हणजे शाश्वत विकास साधता येईल, असेही ते म्हणाले.
हेही वाचलंत का ?