

राजगुरूनगर (जि.पुणे), पुढारी वृत्तसेवा : राजगुरूनगर रेटवडी, (ता खेड) येथील नऊ वर्षाच्या लहान मुलावर बिबट्याने प्राणघातक हत्ला केला आहे. ही घटना शुक्रवारी (दि.१५) संध्याकाळी घडली. सार्थक नवनाथ वाबळे असे मुलाचे नाव असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रेटवडी गावातील गेल्या पंधरा दिवसातील ही दुसरी घटना आहे. या घटनेने ग्रामस्थामध्ये भितीचे वातावरण निमार्ण झाले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रेटवडी येथील वाबळेवस्ती येथे जखमी झालेला सार्थक व वडील नवनाथ वाबळे हे बापलेक संध्याकाळी सात वाजता गुरांच्या गोठयाकडून घरी येत होते. लहान कुत्र्यांचे पिल्लू सार्थकने उचलून घेतले होते. झाडाझुडांपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने लहान कुत्र्यावर व सार्थक वर झेप घेऊन हल्ला केला. या हल्ल्यात सार्थकच्या हाताला व पोटाला जखमा झाल्या आहेत. दरम्यान सार्थकने उचलुन हातात घेतलेले कुत्र्याचे पिलू बिबट्याने पळवले.
सार्थक, वडील नवनाथ यांनी आराडाओरडा केल्यामुळे तेथून बिबट्या पळाला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी वनविभागाचे कर्मचारी सुषमा चौधरी, दत्तात्रय फाफाळे यांनी धाव घेऊन जखमी अवस्थेत असलेल्या सार्थकला पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविले. सुदैवाने सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.
दरम्यान, गेल्या पंधरा दिवसापूर्वी याच परिसरात बिबट्याने साडेतीन वर्षाच्या मुलावर प्राणघातक हत्ला केला होता. या परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. दोन दिवसापूर्वी शेतात गवत कापताना बिबट्याने पाठीमागून येऊन एका शेतकऱ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. प्रसंगावधान दाखवत पळ काढल्यामुळे शेतकरी बचावला हाेता.
या परिसरात शेतकरी व महिला दिवसा शेतकाम करण्यास जीव मुठीत धरून जात असल्याचे चित्र दिसत आहे. तसेच वाबळे वस्तीलगत हाकेच्या अंतरावर सतारकावस्ती येथे जिल्हा परिषेदेची प्राथमिक शाळा आहे. सध्या शाळा सकाळच्या सत्रात सुरू आहेत. लहान मुले पालकांशिवाय शाळेत येत असतात. बिबटयाच्या भितीने मुलांना शाळेत पाठविण्यास पालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वनविभागाने या परिसरात दोन पिंजरे लावले आहेत. परंतु बिबट्या पिंजऱ्याकडे फिरकत नसल्याचे जाणवत आहे. वाबळेवस्ती येथे पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून हाेत आहे.
हेही वाचा :