अजय ढवळे
वाशिम : शहरातील अतिक्रमणाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत असताना वाशिम नगर परिषदेची अतिक्रमण हटाव मोहीम केवळ फाईल, नोटिसा आणि बैठकींपुरतीच मर्यादित राहिल्याची चर्चा शहरभर रंगू लागली आहे. प्रशासनाकडून वेळोवेळी अतिक्रमण हटविण्याच्या घोषणा केल्या जातात, नोटिसा बजावल्या जातात, पंचनामे केले जातात; मात्र प्रत्यक्षात शहरातील अनेक प्रमुख रस्ते, चौक, फूटपाथ आणि सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणे जैसे थे असल्याचे चित्र आहे.
शहरातील नागरिकांना दररोज वाहतूक कोंडी, पार्किंगची समस्या, पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागेचा अभाव आणि अपघाताच्या धोक्याचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी अतिक्रमणामुळे आपत्कालीन सेवांनाही अडथळा निर्माण होत असून चौकात अपुऱ्या जागे मुळे महापुरुषाच्या पुतळ्याच्या कथड्याला देखील वाहणाच्या धडका लागून नुकसान होत असल्याची नागरिकांच्या तक्रारी आहेत. तरीही संबंधित यंत्रणा ठोस कारवाई करण्यास असमर्थ ठरत असल्याचे दिसून येत आहे.
नगर परिषदेकडून अतिक्रमणधारकांना नोटिसा देण्यात आल्याचे सांगितले जाते. मात्र नोटीस दिल्यानंतर पुढे काय कारवाई झाली, किती अतिक्रमणे हटविण्यात आली, किती प्रकरणांवर दंडात्मक कारवाई झाली याबाबत स्पष्ट माहिती समोर येत नसल्याने नागरिकांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरातील अनेक भागांमध्ये वर्षानुवर्षे अतिक्रमणे कायम आहेत. काही ठिकाणी कारवाईचे नाटक करून काही दिवसांत पुन्हा अतिक्रमणे उभी राहत असल्याचे नागरिक सांगत आहेत. त्यामुळे "कारवाई होते की केवळ कारवाईचे दाखले तयार होतात?" असा थेट प्रश्न आता नागरिक विचारत आहेत.
शहर सौंदर्यीकरण, स्वच्छता आणि वाहतूक व्यवस्थेच्या गप्पा मारणाऱ्या प्रशासनाने सर्व प्रकारच्या अतिक्रमणांवर समान आणि निष्पक्ष कारवाई करून शहराला अतिक्रमणमुक्त करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. "कागदोपत्री कारवाई की अतिक्रमणधारकांना अभय?"...वाशिम नगर परिषदेच्या भूमिकेवर नागरिकांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न उपस्थित.
⚠️ प्रश्न अनुत्तरितच...
👉 अतिक्रमण हटविण्याच्या कारवाया प्रत्यक्षात किती झाल्या?
👉 नोटिसा देऊन प्रशासन मोकळे तर होत नाही ना?
👉 प्रभावशाली अतिक्रमणधारकांवर कारवाई का होत नाही?
👉 शहरातील फूटपाथ नागरिकांसाठी की अतिक्रमणधारकांसाठी?