

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेकडून सेव्हन हिल ते सूतगिरणी आणि शहानुरमियाँ दर्गा मार्गावरील अतिक्रमण हटवताना माठ, कुंड्या आणि फुलझाडांच्या साहित्यावर बुलडोजर चालवण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यावरून मंगळवारी (दि.5) स्थायी समिती बैठकीत सदस्यांनी प्रश्नांचा भडिमार करून प्रशासनाला धारेवर धरले.
यावरून सभापती अनिल मकरिये यांनी प्रशासनाला स्पष्ट निर्देश देत अतिक्रमण हटवताना संवेदनशीलता राखा, कोणतीही कारवाई करण्यापूर्वी संबंधितांना किमान 24 तासांची पूर्वसूचना देण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी कारवाई करा, परंतु नागरिकांचे नुकसान टाळा, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला.
शहरातील वाढत्या अतिक्रमणांमुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडी व पार्किंग समस्येवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने 29 एप्रिल रोजी सेव्हन हिल ते गजानन महाराज मंदिर व सूतगिरणी ते शहानुरमिया दर्गा चौका या विकास आराखड्यातील (डीपी) रस्त्यावरील अतिक्रमणावर बुलडोझर फिरवला. मात्र या कारवाईवेळी पथकाने फुटपाथवरील विक्रेत्यांच्या माठ, कुंड्या आणि फुलझाडांच्या साहित्यावर बुलडोजर चालवण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
या मुद्द्यावरून मंगळवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवक अमित भुईगळ यांनी प्रशासनाला जाब विचारला. जेसीबीने एका महिलेचे माठ फोडल्याच्या घटनेनंतर तिला कोणती मदत देण्यात आली का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावर उपायुक्त सविता सोनवणे यांनी आपण त्या दिवशी रजेवर असल्याचे सांगत उत्तर टाळण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.
सभापतींनीही कारवाईपूर्वी नोटीस देण्यात आली होती का, असा सवाल करत प्रशासनाची कोंडी केली. मात्र आयुक्तांच्या आदेशानुसार कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले असले, तरी संभाजीपेठ ते विद्यापीठ मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई झाली का, या प्रश्नावर अधिकारी निरुत्तर झाल्याचे पहायला मिळाले.
दरम्यान या गदारोळानंतर सभापती अनिल मकरिये यांनी कारवाई करा, पण नागरिकांचे नुकसान टाळा, असे स्पष्ट निर्देश दिले. या सर्व घडामोडींमुळे अतिक्रमण हटाव मोहिमेतील संवेदनशीलतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, पुढील कारवाईत प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे शहराचे लक्ष लागले आहे.
व्याजाने पैसे काढून उभा केलेला व्यवसाय उद्ध्वस्त
या बैठकीत नगरसेवक सुरेंद्र कुलकर्णी यांनी पथकाकडून करण्यात आलेल्या कारवाईच्या पद्धतीवर तीव नाराजी व्यक्त केली. तसेच अनेकजण कर्ज काढून छोटा व्यवसाय उभा करतात. त्यांचे अशा प्रकारे अचानक नुकसान केल्यास ते पुन्हा सावरणे कठीण होते, असे त्यांनी नमूद केले. या विक्रेत्यांना किमान आपले साहित्य हलवण्यासाठी तरी वेळ द्यावा, अशी मागणी करत त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केला.