गडचिरोली: पुढारी वृत्तसेवा: नक्षलवादी असल्याचे सांगून बांधकाम कंत्राटदाराकडून ७० लाखांची खंडणी वसूल केल्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी १० नक्षल समर्थकांना अटक करण्यात आली. ही कारवाई अहेरी तालुक्यातील पेरमिली पोलिसांनी केली.
चैनू आत्राम (वय ३९), दानू आत्राम ( वय २९, दोघेही रा. आलदंडी), शामराव वेलादी (वय ४५), संजय वेलादी (वय ३९), किशोर सोयाम (वय ३४) तिघेही रा. चंद्रा, बाजू आत्राम (वय २८, रा. येरमनार टोला), मनिराम आत्राम (वय ४५ रा. रापल्ले), जोगा मडावी (वय ५०, रा. येरमनार टोला), लालसू तलांडे (वय ३०, रा. येरमनार, आणि बजरंग मडावी (वय ४०, रा. मल्लमपल्ली, ता. अहेरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, काही जण नक्षल्यांच्या वेशभूषेत ५ नोव्हेंबरच्या रात्री बांडिया नदीवर सुरु असलेल्या पुलाच्या बांधकामस्थळी जाऊन तेथील कर्मचाऱ्याचे अपहरण केले. त्यानंतर त्यास ७० लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास बांधकाम साहित्याची जाळपोळ करुन जीवे मारण्याची धमकीही त्यांनी दिली. यासंदर्भात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता सर्व जण नक्षल समर्थक असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी उपरोक्त १० जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून नक्षल गणवेश, भरमार बंदुका व अन्य साहित्य ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचलंत का ?