भंडारा : पुढारी वृत्तसेवा : लग्न समारंभासाठी दुचाकीवरून जात असलेल्या मायलेकाला वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रकने चिरडले. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना भंडारा-खात मार्गावरील सातोनाजवळ सोमवारी (दि.२) सकाळी घडली. गीता शामराव रहांगडाले (वय ५०) असे आईचे, तर राजू शामराव रहांगडाले (वय २६ रा. हनुमाननगर, नागपूर) असे मृत मुलाचे नाव आहे.
गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील परसवाडा या गावी लग्न कार्यक्रमाकरिता राजू हा आपल्या आईसोबत दुचाकीवरून नागपूरहून तिरोडाकडे जात होता. दरम्यान, वाळू भरून जात असलेला ट्रक नागपूरच्या दिशेने जात होता. सातोना-मोहदुरा मार्गावर अचानक दुचाकी व ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. यात गीता आणि राजू रहांगडाले यांचा जागीच मृत्यू झाला.
घटना घडताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच वरठी पोलीस घटनास्थळी पोहोचले. मृतदेहांवर भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. ट्रक चालक व क्लिनर यांनी स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केले. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वंजारी करीत आहेत.
हेही वाचलंत का ?