विदर्भ

अमरावती : अंगाला हळद लागण्यापूर्वीच नवरदेवाचा अपघाती मृत्यू

स्वालिया न. शिकलगार

अमरावती; पुढारी वृत्तसेवा : लग्नाची तारीख जसजशी जवळ येते तसतसे घरातील वातावरण मंगलमय होऊन जाते. विवाह सोहळा आठ दिवसांवर आला. पूर्वतयारी आटोपली होती. नवरदेव- नवरीचे व इतर कपडे आणण्यासाठी स्वतः नवरदेव मित्रांसोबत गेला. परत येताना जरूड येथील दत्त मंदिराजवळ झालेल्या अपघातात नवरदेवाचा मॄत्यू झाला. वरूड तालुक्यातील पेठ (मांगरुळी) येथील गिरी परिवार व नागपूर येथील या दोन्ही परिवारावर दुःख कोसळले.

भावी नवरदेव सागर सुभाष गिरी (वय २७, रा. मांगरुळी पेठ) हा सांगली येथे कायझन होम अप्लायसेन्स कंपनीत नोकरीवर होता. त्याचे लग्न नागपूर येथील तरुणीशी ठरले होते. लग्नाचा मुहूर्त १८ मे असल्यामुळे त्या मंगलक्षणाची आतुरता लागली होती. भावी नवरदेव सागर आणि त्याचा मित्र रोशन तूपे हे दोघे (MH ३७ N ३७६८) या दुचाकीने कपडे घेऊन गावाकडे परत येत असताना जरूड येथील दत्त मंदिराजवळ दुचाकी अनियंत्रित होऊन दुभाजकावर आदळली. यात दोघेही जबर जखमी झाले.

यानंतर ग्रामीण रुग्णालय वरुड येथून नागपूरला नेण्यात आले. इकडे मुलाच्या तब्येतीसाठी घरच्यांनी देवाला साकडे घातले होते, पण नियतीला ते मान्य नव्हते. उपचारादरम्यान सागरची प्राणज्योत मालवली.

अंगाला हळद लागण्याआधी तरुणाचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने पेठ व मांगरुळी या गावांवर शोककळा पसरली आहे.

SCROLL FOR NEXT