कल्याण : सतीश तांबे
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकाल घोषित होऊन महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणूकीनंतर तब्बल सव्वा महिन्याच्या अडथळ्यांचा टप्पा पार करीत मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात म्हणजेच 16 मार्चला महासभेचा मुहूर्त सापडला असून यासभेत स्थायी, महिला बाल कल्याण आणि शिक्षण समितीच्या सदस्यांची नियुक्तीची कोंडी फुटणार आहे.
विशेष म्हणजे पालिकेच्या पहिल्याच महासभेत पावसाळापूर्वी रस्त्याची देखभाल व दुरुस्ती करणे, मोठे नाले सफाई व उल्हास नदीला पालिका क्षेत्रातील मोहने-गाळेगाव नाल्याचे सांडपाण्यामुळे प्रदूषण थांबवणे या तीन कामाच्या 45 कोटीहून अधिक रकमेच्या खर्चाचे प्रस्तावाचे विषय मंजुरीसाठी महासभेच्या पटलावर ठेवण्यात आले आहेत. महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणूकी नंतर देखील महासभा घेतली जात नसल्याची ओरड भाजपसह उद्धव ठाकरे सेनेकडून केली जात होती. महासभा अभावी पालिकेतील महत्वाच्या असलेल्या स्थायी, महिला बाल कल्याण आणि शिक्षण समितीच्या सदस्यांची नियुक्त्या रखडल्या होत्या. अखेर महासभेला मुहूर्त मिळाला असून या सभेत या नियुक्त्यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
महापालिकेत भाजपचे 50, शिंदे सेनेचे 53, मनसेचे 5, उद्धव सेनेचे 11, काँग्रेसचे 2 आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा 1 असे 122 नगरसेवक आहे. मात्र शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे 8 नगरसेवकांचा गट आहे. तीन नगरसेवकांनी अद्याप कोणत्याही गटात सहभाग घेतलेला नाही. त्यामुळे महासभेत या विषयावरही चर्चा होऊ शकते. महापालिकेत उद्धव सेना आणि काँग्रेस हे विरोधी पक्षाची भूमिका बजावणार आहे. महापालिकेच्या तौलनिक संख्या बळानुसार स्थायी समितीत 16 सदस्य नियुक्तीसाठी एक सदस्य नियुक्तीसाठी किमान सात नगरसेवकांचे संख्याबळ लागेल, असा प्रश्न असल्याने शिवसेना शिंदे गटाचे 53 सदस्य असल्याने सात सदस्य विना अडचणीने नियुक्ती होऊन चार सदस्यांची संख्या अधिक राहणार आहेत तर भाजपाचे 51 सदस्य बळ असल्याने भाजपाचे सात सदस्य विना अडचणीने सरळ नियुक्ती होणार आहेत. भाजपकडे ही 3 सदस्यांचे अधिक संख्याबळ राहणार आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे सद्य स्थितीला आठ सदस्याचे संख्याबळ असल्याने त्याचा एक सदस्याची नियुक्ती होईल.
स्थायी समितीतील 16 वा सदस्याची नियुक्ती होण्या करीता मानसेकडे पाच सदस्यांचे संख्याबळ असल्याने शिवसेना शिंदे गटाकडे अधिक चार सदस्याचे संख्या बळ असल्याने मनसेला शिंदेगट मदतीला धावून जाऊन महापौर पदाच्या निवडीसाठी मनसेनेने अप्रत्यक्षरित्या केलेल्या मदतीमुळे त्याचा एक सदस्य स्थायी समितीवर आणण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. महिला बाल कल्याण, शिक्षण समितीत 11 सदस्य नियुक्त केले जाणार आहेत. ही स्थायी समिती सदस्य नियुक्ती प्रमाणे कोरच्या आकड्यांची जुळवा जवळ केली जाणार आहे .
पहिल्याच महासभेत महत्वाच्या समितीच्या सदस्य नियुक्त्या सह अन्य असे दहा विषय सभेच्या पटलावर आहेत. या मध्ये महत्वाचे असे पावसाळ्यापूर्वी पालिका क्षेत्रातील दहा प्रभाग कार्यालया अंतर्गत असणारे मोठे नाल्यातील गाळ काढण्याच्या कामाला 4 कोटी 29 लाख रुपये खर्चास मंजूरी देण्याचा विषय, सन 2026-27 या कालावधी साठी पालिका क्षेत्रातील कल्याण-डोंबिवली विभागातील रस्त्यांची देखभाल दुरुस्ती करणेच्या प्राकलन रक्कम रुपये 34 कोटी 36लाख 82,हजार रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देणे, त्याचबरोबर उल्हास नदी प्रदूषण रोखण्यासाठी मोहने आणि गाळेगावातून येणारा नाला वळविण्याकरीता 6 कोटी 47 लाख रुपये खर्चाच्या प्रस्ताव मंजूरीसाठी महासभेसमोर ठेवला आहे.
महापालिका हद्दीत भटक्या कुत्र्यांची दहशत आहे. भटका कुत्रा चावल्याने रेबीज झाल्याच्या भितीपोटी एका तरुणाने आत्महत्या केली. त्यानंतर एका सातवर्षीय मुलीचा भटका कुत्रा चावल्याने मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेची गंभीर दखल घेत भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचा विषय महासभेत चर्चेला ठेवला आहे. याशिवाय रस्त्यावरील खड्डे, अतिक्रमण हा विषय देखील चर्चेकरीता आहे.