शशिकांत सावंत, ठाणे
90 पैकी केवळ 23 नगरसेवक पदरी असलेल्या भाजपने अखेर नवीन गणिते जुळवत महापौरपद मिळवले खरे; परंतु भाजपच्या मतांमध्ये झालेली फाटाफूट, अधिकृत उमेदवारांचा झालेला पराजय आणि बंडखोर उमेदवारांचा झालेला विजय, यामुळे चंद्रपूरमध्ये जे गमावले ते भिवंडीत कमावले अशी सार्वत्रिक प्रतिक्रिया काँग्रेस पक्षाबद्दल उमटत आहे. भिवंडी महापौरपदाची निवडणूक लांबत जाऊन अखेर शुक्रवारी 20 फेब्रुवारी रोजी झाली आणि महायुती, महाविकास आघाडी या दोघांच्याही मतांमध्ये मोठी फाटाफूट झाल्याने तिसऱ्यालाच महापौरपदाची लॉटरी लागली.
भिवंडी महापालिकेत काँग्रेस 30, भाजप - 23, राष्ट्रवादी शरद पवार - 12, शिवसेना 12, समाजवादी 6, भिवंडी विकास आघाडी 3, कोणार्क विकास आघाडी 4 असे एकूण पक्षीय बलाबल आहे. काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी यांना समावादी पक्षाने मदत केली असती, तर त्यांचे 48 इतके संख्याबळ होत होते. त्यामुळे महाविकास आघाडीचा विजय नक्की मानला जात होता. मात्र, समाजवादी पक्षाने ऐनवेळी शिवसेनेबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे काँग्रेसने महापौरपदाचा हट्ट सोडत भाजप बंडखोर
नारायण चौधरी यांना हाताशी धरून सत्तेच्या चाव्या आपल्याकडे राहतील याची खबरदारी घेतली. तथापि, या राजकारणामध्ये भाजपचा बंडखोर असेना; परंतु तो महापौर झाला आहे. काँग्रेसच्या सर्वाधिक जागा असूनही त्यांच्या वाट्याला उपमहापौरपद आले आहे. महापौरांना 48 मते मिळाल्याने त्यांना बहुमत आहे. तर उपमहापौरांना केवळ 43 मते मिळाल्याने हा आकडा अल्पमतांचा आहे. भाजपने बंडखोराबरोबर जमवून घेतल्यास त्यांना हे महापौरपद टिकवता येईल.
काँग्रेसला मात्र भाजपची मते फोडल्याचा आनंद आहे. यामध्ये सहा नगरसेवक आमच्यासोबत आल्याचे सांगत काँग्रेसने चंद्रपूरचा वचपा आम्ही भिवंडीत काढल्याची टिमकी मिरवली आहे. मात्र, हा आनंद किती काळ टिकणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत.