सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : अक्कलकोट तालुक्यातील दहिटणे येथील स्वामी समर्थ सहकारी साखर कारखाना यंदाच्या सन २०२२-२०२३ चा गळीत हंगामात सुरू करण्यात येणार आहे. या करिता यंत्रसामुग्रीची दुरूस्ती, परिसराची स्वच्छतेच्या कामाला गती देण्यात आली आहे. साखर कारखाना सुरू होणार असल्याने अक्कलकोट तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकर्यांतून समाधान व्यक्त होत आहे.
स्वामी समर्थ सहकारी साखर कारखाना हा गेल्या १० दहा वर्षाहून अधिक काळ बंद होता. तत्कालीन कार्यकारी संचालक यांच्या मनमानी भ्रष्ट कारभारामुळे साखर कारखाना अडचणीत आला होता. बंदच्या काळामध्ये कारखाना सुरू करण्याबाबत पदाधिकारी हे प्रयत्नशील होते. परंतु, त्या काळातील निसर्गाच्या लहरीपणामुळे पावसाचे प्रमाण पाहता ऊस म्हणावा तेवढा कार्यक्षेत्र नसल्याने कारखाना बंद ठेवावा लागला. सध्या अक्कलकोट तालुक्याच्या कार्यक्षेत्रात ऊस लागवडीची क्षमता अधिक असून कारखान्याच्या सभासदांना ऊस घालण्या कामी अडचण निर्माण होऊ नये, या करिता कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी पुढाकार घेऊन यंदा गळीत हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतल आहे.
अनेकांनी स्वामी समर्थ सहकारी साखर कारखाना कायम स्वरूपी बंद पडल्याच्या वावड्या उठवल्या होत्या. मात्र माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी यंदाचा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी गेल्या आठ दिवसापासून कारखान्याच्या कार्यस्थळावर ठाण मांडून आहेत. साखर कारखान्याच्या केन यार्ड पासून ते क्रेशर मिल, बॉयलर, टरबाईन, ज्यूस, शुगर मील, गोदाम, प्रशासन विभाग या विभागासह संपूर्ण परिसराची स्वच्छतेचे काम प्रगतीपथावर असून यंत्र सामुग्रीच्या दुरूस्ती करिता तज्ज्ञांना बोलावण्यात आलेले आहे. या बरोबरच लागणारी अधिकारी व कर्मचारी हजर होत आहेत. एकूणच साखर कारखाना सुरू होण्याकामी आवश्यक त्या शासन स्तरावरील परवानग्यादेखील घेतल्या जात आहेत.