जत: पुढारी वृत्तसेवा : जत तालुक्यातील पाणीटंचाई तीव्र झाली आहे. या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सकारात्मक चर्चा केली आहे. वारणा धरणातील उपयुक्त पाणीसाठयामधून म्हैसाळ उपसा सिंचन योजनेला पाणी सोडण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. येत्या तीन ते चार दिवसांत म्हैसाळ योजनेतून जत तालुक्याला पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती खासदार संजयकाका पाटील (MP Sanjay Patil) यांनी दिली. ते जत तालुक्याच्या दौऱ्यावर दोन दिवसापासून आहेत. आज (दि.१५) टंचाई आढावा बैठक घेण्यात आली. यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
खासदार पाटील (MP Sanjay Patil) म्हणाले की, सद्यस्थितीत कोयना पाणलोट क्षेत्र व वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये तुलनात्मक कमी पाऊस आहे. तसेच मुक्त पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान कमी असल्याने मुक्त पाणलोट क्षेत्राचे पाणी नदीत पुरेशा प्रमाणात नाही. ही वस्तुस्थिती आहे. परंतु जत तालुक्यात पाणी टंचाईने तीव्र स्वरूप धारण केले आहे. सद्यस्थितीत आपण ही योजना चालू करू शकत नव्हतो. वारणा धरणामध्ये उपयुक्त पाणीसाठा फक्त सात टीएमसी आहे. त्यातील काही पाणी जत सारख्या अत्यंत दुष्काळग्रस्त भागात व सद्यस्थितीत टंचाईच्या सर्वात जास्त तालुक्यात देण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा केला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारणा धरणातील दोन टीएमसी पाणी दीड ते दोन महिन्यासाठी टंचाई कालावधीत फक्त जत तालुक्यातील म्हैसाळ योजनेसाठी पाणी सोडा, अशा सूचना दिल्या आहेत.
याकरीता कार्यकारी संचालक अतुल कपोले, अधीक्षक अभियंता पाटोळे, कोल्हापूरचे अधीक्षक अभियंता सुर्वे अशा क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांकडे प्रचंड पाठपुरावा करून पाणी सोडण्यास मंजुरी मिळवली आहे. तीन ते चार दिवसात योजना सुरू होऊन जत कालव्याला पाणी सोडण्यात येणार आहे. सदरचे पाणी सुटल्यामुळे अत्यंत दुष्काळी असलेल्या जत तालुक्यात पाणी मिळाल्याने दिलासा मिळणार आहे. तालुक्यातील उर्वरित प्रश्न प्राधान्याने सोडवण्यात येणार आहेत. याबाबत देखील पाठपुरावा सुरू असल्याचे खासदार पाटील यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा