विटा; पुढारी वृत्तसेवा : पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल आमदार अनिल बाबर गटाचे सतीश निकम यांची तालुकाप्रमुख पदावरून हकालपट्टी करत असल्याची घोषणा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी केली. आगामी विटा पालिका निवडणूक शिवसेना ताकदीने लढविणार आहे. स्थानिक पातळीवर कोणाशी युती करायची याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी तालुकाध्यक्ष सतिश निकम यांना पक्षातून डच्चू देत जिल्हाप्रमुख विभूते यांनी खानापूरचे दादा भगत यांच्याकडे खानापूर तालुका प्रमुख म्हणून कार्यभार सुपुर्द केला. यावेळी विभूते म्हणाले की, कोणाच्या जाण्याने पक्ष संपत नसतो, शिवसेनेची विचारधारा तळागाळापर्यंत रूजलेली आहे. पक्षात कार्य करण्यासाठी अजून बरेच जण इच्छुक आहेत. स्व.बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची आणि शिवसेनेची नाळ सामान्याशी जुळलेली आहे. मुळातच राज्यात ज्यांनी ज्यांनी बंड केले आहे, त्यांनी मागील निवडणूक शिवसेना भाजपासोबत लढवली होती. ती जिंकताना शिवसेनेची मोलाची मदत झाली आहे. शिवसेना वगळली तर पुढील निवडणुका त्यांना जिंकणे कठीण आहे, असेही ते म्हणाले.
शिवसेनेला संपवणारे संपले पण शिवसेना कधीही संपली नाही. ज्यांच्या काही अडचणी, प्रश्न असतील त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहनही विभूते यांनी केले. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख मिलिंद कदम, माजी उपजिल्हाप्रमुख शिवाजीराजे शिंदे, राज लोखंडे, अमर क्षीरसागर, युवा नेते समर्थ शिंदे उपस्थित होते.
हेही वाचलंत का?