सांगली

Congress: दुष्काळी उपाययोजनेसाठी काँग्रेस रस्त्यावर; विजापूर – गुहागर महामार्ग रोखला

अविनाश सुतार

जत: पुढारी वृत्तसेवा : जत तालुक्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाले आहे. मात्र सरकार जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहेत. शासनाने वास्तविक पाहता दुष्काळाच्या सवलती त्वरित लागू करणे गरजेचे आहे. दुष्काळाच्या भयावह पार्श्वभूमीवर तातडीने उपाययोजना करा, अन्यथा यापुढेही तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा आमदार विक्रमसिंह सावंत यांनी दिला. शनिवारी (दि.१५) दुपारी काँग्रेसने (Congress) दुष्काळ निवारणासाठी उपाययोजना सुरू कराव्यात. या मागणीसाठी शहरातून जाणारा विजापूर- गुहागर राष्ट्रीय महामार्ग रोखला. व ठीक ठिकाणी टायर पेटवून शासनाचा निषेध व्यक्त केला. यावेळी आमदार सावंत बोलत होते.

यावेळी आ. विक्रमसिंह सावंत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय उर्फ नाना शिंदे, मार्केट कमिटीचे संचालक बाबासाहेब माळी, आप्पाराया बिराजदार, बसवराज बिराजदार, सरदार पाटील, नाथा पाटील, माणिक वाघमोडे, अशोक बन्नेनवार, अण्णासाहेब गायकवाड, संतोष भोसले, युवराज निकम, निलेश बामणे, तुकाराम माळी, दत्ता निकम, महादेव पाटील, भूपेंद्र कांबळे, बाळासाहेब तंगडी, रवी पाटील, परशुराम मोरे, सई नदाफ, गणी मुल्ला, रमेश साबळे, अतुल मोरे आदी आंदोलनात सहभागी झाले (Congress) होते.

आ. सावंत व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नाना शिंदे हे शेकडो शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरले होते. तर ठिकठिकाणी टायर पेटवून सरकारचा निषेध केला. मागण्यासाठी घोषणा देण्यात आल्या. शनिवारी साडेदहा वाजल्यापासून हे आंदोलन सुरु होते. जिल्हाधिकारी आल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा घेतला होता. परंतू या मार्गांवरील पाच किलोमीटर पर्यंत वाहतूक ठप्प झाली होती. परिणामी वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली होती.

यावर्षी अवकाळी अगर कोणत्याही प्रकारे पाउस न झाल्याने जत तालुक्यात पिण्याचे पाणी जनावरांचा चारा यांचा प्रश्न अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याकरिता शासनाने त्वरित जत तालुक्यातील जनावरांना चारा व पाणी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. अन्यथा जनावरांना घेऊन स्थलांतर करावे लागणार आहे. जत तालुका कायम दुष्काळी व अवर्षण प्रवण क्षेत्रात असल्याने चालू वर्षी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे तातडीने जत तालुका दुष्काळी जाहीर करण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केले.

दरम्यान, आंदोलन कर्त्यांनी चालू वर्षी खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेल्याने शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी. खरीप पिक वाया गेल्याने विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळवून द्यावी, शासनाच्या दुष्काळी संदर्भातील सर्व सवलती द्याव्यात. तसेच सध्या जत तालुक्यात पाऊस नसला तरी कोयना, चांदोली धरणक्षेत्रात पाऊस सुरु असल्याने म्हैसाळ योजनेचे आवर्तन जत तालुक्याकरिता सुरु करून जत तालुक्यातील पिण्याच्या आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा. तसेच या आवर्तनाचे बील टंचाई निधीतून भरण्यात यावे. जनावरांच्या चाऱ्याकरिता शासनाकडून थेट अनुदान मिळावे. सध्या गाई, म्हशींच्या दुधाचे दर खूप कमी झाले आहेत. या दुध दरात स्थिरता येण्यासाठी शासनाने उपाययोजना कराव्यात. खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेल्याने शेतकऱ्यांना शासनाकडून प्रति हेक्टरी २५ हजार अनुदान मिळावे. पाणी टंचाई असणाऱ्या गावांना टँकरद्वारे तात्काळ पाणी पुरवठा करण्यात यावा, आदी मागण्या यावेळी केल्या आहेत.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT