पाथरी (सांगली) : पुढारी वृत्तसेवा : सांगली जिल्ह्यातील पोलिसांसोबत वॉरंट तामील करण्यासाठी गेलेल्या पाथरी पोलिसांच्या पथकावर हल्ला करण्यात आला आहे. ऊस तोड मजुरांच्या टोळीने पोलिसांवर हल्ला केल्याची घटना दि. १३ फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठच्या सुमारास तालुक्यातील हादगाव शिवारात घडली. या घटनेची अधिक माहिती अशी की, सांगली जिल्ह्यातील आटपाडी पोलिस स्टेशनचे पथक आरोपीला वॉरंट तामील करण्यासाठी पाथरी येथे आले होते. पोलिसांना मदत करण्यासाठी पाथरी येथील पो.उ.नि सय्यद जाफर हे आपल्या कर्मचाऱ्यासोबत गेले.
रविवार रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास हादगाव येथे राजाभाऊ श्रीराम चव्हाण याला वॉरंट तामील करत असताना संबधिताने पोलीस कर्मचाऱ्यासोबत हुज्जत घातली आणि सोबत येण्यास नकार दिला. त्या ठिकाणी जमलेल्या इतर तिघांनी पोलिसांच्या पथकाला लाथाबुक्यांनी मारहाण केली. थोड्या वेळाने आणखी इसम गोळा झाले. त्यांनी लाठ्या काठ्यांनी पोलिसांवर हल्ला केला. या प्रकारामुळे पोलीसांना वॉरंट तामील करता आले नाही.
हल्लेखोरांपासून कशीबशी सुटका करून पोलिस वाहनाजवळ आले. असता पोलिसांना त्यांच्या वाहनांच्या चाकामधील हवा सोडल्याचे दिसून आले. प्रसंग अवधान राखत पोलिसांनी पाथरी पोलीस ठाण्यातून अधिक कुमक मागवली. पो.उ.नि सुरनर आणि इतर कर्मचाऱ्याच्या पथकाने प्रदीप भिमराव पवार, शिवाजी परमेश्वर चव्हाण, ज्ञानेश्वर बाबुराव पवार, जालिंदर आसाराम राठोड, संदीप भिमराव राठोड यांना ताब्यात घेतले. चौकशी केली असता त्यांनी पळून गेलेल्या इसमाची नावे सांगितले. परमेश्वर नामदेव राठोड, लखन नामदेव राठोड बाळु आसाराम राठोड हे आरोपी घटनास्थळावरून पळून गेले होते. पो.उ.नि सय्यद जाफर यांच्या फिर्यादीवरून ९ आरोपी विरोधात शासकीय कामात अडथळा करत जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी पाथरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.