सांस्कृतिक गंगा
साहित्य-संस्कृती
डॉ. महेश केळुसकर
यंदाच्या कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक महेश कोठारे यांना यशवंतराव चव्हाण कला जीवन गौरव पुरस्कार प्रकाश ढेरे स्मृत्यर्थ देण्यात आला. तर यंदापासूनच सुरू करण्यात आलेला अजितदादा पवार सामाजिक कार्य पुरस्कार कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांना प्रदान करण्यात आला. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील टिंगरे आणि सुविख्यात ज्येष्ठ नाटककार आणि दिग्दर्शक सतीश आळेकर यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले.
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाल्यावर राज्याची सांस्कृतिक पायाभरणी करणारे पहिले मुख्यमंत्री
स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीदिनी दरवर्षी 12 मार्च रोजी पुण्यातल्या स्व. प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्ट आणि गंगा लॉज मित्र मंडळातर्फे यशवंतराव चव्हाण कला
जीवनगौरव व साहित्य पुरस्कार देण्यात येतात. त्यानिमित्त पुरस्कार वितरणानंतर एक जंगी कविसंमेलन होतं आणि रामदास फुटाणे यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हुडकून आणलेले नवे ताज्या दमाचे कवी आपल्या कविता त्या संमेलनात पेश करतात. यंदा या पुरस्कारांचं आणि कविसंमेलनाचं हे चाळीसावं वर्ष होतं.
गेली 15-20 वर्ष मी या कविसंमेलनातून कविता वाचत आलेलो आहे. यंदाही होतो रामदास नाना फुटाणे आणि अशोक नायगावकर यांनी यंदाच्या कविसंमेलनाचं खुमासदार सूत्रसंचालन केलं. पुरस्कार वितरण समारंभाला आणि कविसंमेलनाला रात्री उशिरापर्यंत टिळक स्मारक मंदिर सभागृहात प्रेक्षकांची गच्च गर्दी होती आणि ती पाहून ढेरे, जाधव परिवाराची पुढची पिढी म्हणजे विजय ढेरे, संजय ढेरे, सचिन जाधव, कुणाल जाधव आणि त्यांच्या जोडीला गौरव फुटाणे, भरत दौंडकर व सगळी मित्रमंडळी हा उपक्रम पुढेही अनेक वर्षं चालू ठेवतील याबद्दल जुन्या मंडळींची व लोकांचीही खात्री पटली.
यंदाच्या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते, चित्रपट दिग्दर्शक महेश कोठारे यांना यशवंतराव चव्हाण कला जीवन गौरव पुरस्कार प्रकाश ढेरे स्मृत्यर्थ देण्यात आला. तर यंदापासूनच सुरू केलेला अजितदादा पवार सामाजिक कार्य पुरस्कार कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांना प्रदान करण्यात आला. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील टिंगरे आणि सुविख्यात ज्येष्ठ नाटककार आणि दिग्दर्शक सतीश आळेकर यांच्या हस्ते हे पुरस्कार दिले. यानिमित्ताने आळेकर यांनी यशवंतराव चव्हाण साहेबांना मराठी नाट्यसृष्टीच्या वतीने लाख धन्यवाद दिले आणि कृतज्ञता व्यक्त केली, ती यासाठी की, चव्हाण साहेबांनी महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर 1961 सालापासून मराठी रंगभूमीसाठी मनोरंजन कर रद्द केला. त्याचा लाभ आजतागायत अनेक मराठी नाट्यनिर्मात्यांना मिळत आहे आणि मराठी नाट्यसृष्टी अजून तग धरून आहे.
महेश कोठारे यांनी रामदास फुटाणे आणि आपली चित्रपट कारकीर्द एकदम कशी सुरू झाली ते सांगितलं. सुरुवातीच्या काळात अण्णासाहेब देऊळगावकर यांनी आपल्याला चित्रपटसृष्टीतील खाचाखोचा कशा समजावून दिल्या त्याच्या आठवणी कोठारेंनी सांगितल्या. बॉलीवूडच्या तुलनेत मराठी चित्रपट सृष्टी इमानदार आणि मेहनती आहे त्याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांनी आपल्या तडाखेबंद शैलीत निसर्ग आणि माणूस यांच्यामध्ये अद्वैत पाहिजे आणि निसर्गाचं रक्षण करणं म्हणजे स्वतःचंच रक्षण करणं, हा आपला महत्त्वाचा विचार पुन्हा एकदा अधोरेखित केला. मंगेश पाडगावकर यांच्या कवितांमधील
‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ यासारख्या कवितांची उदाहरणे देत आपल्या भाषणाकडे त्यांनी लोकांचं लक्ष वेधून घेतलं. प्रसाद गावडे मूळचे गोव्याचे. तळकोकणातील सांगेली, सावंतवाडी हे गाव या इंजिनिअरने सोशल मीडियावर चर्चेत आणलं. कोकणी रानमाणूस या नावानं प्रसिद्ध असलेल्या प्रसाद गावडे यांनी पर्यावरणवादी म्हणून ख्याती मिळवली. उच्च पगाराची नोकरी सोडून त्यांनी निसर्गाच्या सान्निध्यात स्थायिक होत शाश्वत जीवनशैली, इको-टूरिझम, पारंपरिक शेती व कोकणी संस्कृती संवर्धनाचं कार्य सुरू केलं.
आपल्या कोकणी रानमाणूस चॅनेलद्वारे ते कोकणची खाद्यसंस्कृती, शेती आणि ग्रामीण जीवनशैली जगासमोर आणतात. पर्यटकांना कोकणातील जंगल आणि ग्रामीण जीवनाचा अनुभव देण्यासाठी ते निसर्गपूरक पर्यटन चालवतात. देशी बियाणे गोळा करणे, जंगल संरक्षण, नद्यांची स्वच्छता आणि शाश्वत शेती (इको फार्मिंग)वर त्यांचा भर आहे.
जुनी संस्कृती, रानावनातील पदार्थ आणि पारंपरिक औषधी वनस्पतींची माहिती देणारी जीवनशाळा त्यांनी सुरू केली आहे. प्रसादच्या छोट्याशा भाषणाला उपस्थित प्रेक्षकांनी वारंवार टाळ्या वाजवून पसंती दिली.
प्रेषित प्रदीप सिद्धभट्टी, अविनाश पोईनकर आणि प्रतिभा खैरनार यांच्या कवितासंग्रहांना साहित्य पुरस्कार देण्यात आले. त्यापूर्वी , हे कवितासंग्रह पुरस्कारासाठी निवडणाऱ्या समितीच्या प्रमुख, ज्येष्ठ कवयित्री अंजली कुलकर्णी यांनी तिघांच्याही कवितांची वैशिष्ट्ये सांगणारं आपलं टिपण वाचून दाखवलं. अनेकदा फक्त नावं सांगून आणि रक्कम जाहीर करून पुरस्कारार्थींची बोळवण केली जाते. पण हे पुरस्कार कशासाठी दिले, हे सांगणारं निवेदन पुरस्कार आयोजकांनी जाहीरपणे सांगितलं, तर निश्चितच त्या पुरस्काराची विश्वासार्हता वाढते. ढेरे चॅरिटेबल ट्रस्ट व गंगा लॉज मित्र मंडळाने यावेळीही ही परंपरा सांभाळली.
पूर्वी बाबासाहेब जाधव असताना गंगा लॉज हे फक्त 12 मार्चच्या दिवशीच कवींचे लाड करणारं ठिकाण नव्हतं, तर वर्षभरासाठी गंगा लॉज कवींचा आधार असायचं. तिथं कवींना मिळणारं प्रेम आणि वागणूक हे एक अप्रूपच म्हणायला हवं. गंगा लॉजवर कवींची उठ-बस करणारा, त्यांना हवं-नको ते बघणारा आणि प्रसंगी कवींना चार शब्द सुनावून ठिकाणावर आणणारा रामजी नावाचा एक सहाय्यक होता. मध्यंतरी तो हे जग सोडून गेला.
दरवर्षी 12 मार्चला नायगावकरांना आणि मला त्याची आठवण येते. 12 मार्चचं हे कवी संमेलन ऐकायला शरद पवार, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, उल्हासदादा पवार, गिरीश बापट अशी सगळी मंडळी पूर्वी यायची. नाना पाटेकर, नागराज मंजुळे, अजय-अतुल, सयाजी शिंदे, रंगनाथ पठारे असे अनेक कलावंत आणि साहित्यिक यशवंतराव चव्हाण जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी ठरलेले आहेत.
गंगा लॉजची ही सांस्कृतिक गंगा पुढेही चालू राहील, असा विश्वास नवीन पिढीच्या मित्रमंडळाने दिलेला आहे. त्यांचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे.