Mango Cashew Crop Damage Raigad Pudhari
रायगड

Raigad Unseasonal Rain | अवकाळी पावसाने आंबा-काजू बागांचे मोठे नुकसान; मदतवाटपाच्या विलंबावर मंत्री भरत गोगावले नाराज

Bharat Gogawale | पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश; कोट्यवधींचा निधी मंजूर असूनही अनेक शेतकरी प्रतीक्षेत

पुढारी वृत्तसेवा

Mango Cashew Crop Damage Raigad

अलिबाग : रायगड जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून काही भागांत तब्बल ९० टक्क्यांपर्यंत हानी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कृषी आढावा बैठकीत मदतवाटपातील विलंबाबाबत रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

खरीप हंगाम २०२६ नियोजनासाठी आयोजित जिल्हास्तरीय बैठकीस आमदार महेंद्र दळवी, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, कृषी सभापती वैकुंठ पाटील, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत सर्व तालुक्यांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वंदना शिंदे यांनी सादर केलेल्या अहवालानुसार एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ दरम्यान अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे जिल्ह्यातील ९ हजार ६९५ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित झाले आहे. सुमारे ३१ हजार शेतकऱ्यांसाठी १३ कोटी ३६ लाख ९५ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून त्यापैकी १२ कोटी ५५ लाख रुपये २६ हजार ८३२ शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले आहेत. मात्र ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण असल्याने अनेक शेतकरी अद्याप मदतीपासून वंचित असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

यावर संताप व्यक्त करत मंत्री भरत गोगावले यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांमध्ये कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नसल्याचा इशारा दिला. उरण आणि महाड तालुक्यांत पंचनामे सुरू असल्याचे समजताच त्यांनी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये तत्काळ पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश दिले. कोकणातील शेतकऱ्यांकडे अल्प क्षेत्राची जमीन असून नुकसान मोठे असताना प्रशासनाने वेळकाढूपणा करू नये, अन्यथा संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीत कृषी विभागाच्या विविध योजनांचाही आढावा घेण्यात आला. घन पद्धतीने आंबा लागवड तसेच सीआरए पद्धतीने फळबाग विस्ताराला प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या. कृषी सहाय्यकांना ठोस उद्दिष्टे देऊन अधिकाधिक क्षेत्रावर आधुनिक पद्धतीने फळबाग लागवडीसाठी मार्गदर्शन करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत २०२५-२६ मध्ये जवळपास दोन हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली असून त्यापैकी ९१ हेक्टर क्षेत्र घन पद्धतीने विकसित करण्यात आले आहे.

याशिवाय बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागाने जनजागृती वाढवावी, असे निर्देशही देण्यात आले. शासकीय रोपवाटिकांमधून मोठ्या प्रमाणावर बांबू रोपांची निर्मिती व विक्री करण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

खरीप हंगामाच्या तयारीबाबत जिल्ह्यात खते, बियाणे आणि कीटकनाशकांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले. खतटंचाई टाळण्यासाठी युरियाचा संरक्षित साठा बाजारात उपलब्ध करून देण्यात आल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला नसल्याचे सांगण्यात आले. तसेच निकृष्ट व अनधिकृत कृषी निविष्ठांविरोधात कारवाई करत १६ खत विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आले असून काही कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बैठकीत अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी आणि कृषी योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी प्रशासनाने अधिक संवेदनशीलतेने काम करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT