रायगड

Raigad forest fire | वनव्याने चंदन बाग उद्ध्वस्त; शेतकरी धर्मेश रिंगे यांचे मोठे नुकसान

शेतकरी आधीच अवकाळी पाऊस, दुष्काळ, नैसर्गिक संकटे यांचा सामना करत असताना आता मानवनिर्मित वनव्याचे संकट

पुढारी वृत्तसेवा

पोलादपूर : लहुळसे गावातील शेतकरी धर्मेश रामचंद्र रिंगे यांनी अनेक वर्षांच्या मेहनतीने उभी केलेली चंदन आणि सुरा झाडांची बाग नुकत्याच लागलेल्या वनव्यात मोठ्या प्रमाणात जळून खाक झाली आहे. वनव्याच्या ज्वाळांनी काही तासांतच शेतकऱ्याच्या कष्टांचे स्वप्न उद्ध्वस्त केले.

आगीत अनेक चंदन व सुरा झाडांचे नुकसान झाले असून शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसला आहे. घटनास्थळी काढलेल्या छायाचित्रांमध्ये वनव्याच्या ज्वाळा अजूनही धुमसत असल्याचे दिसून येते. आगीमुळे परिसरातील झाडे करपली असून अनेक मौल्यवान चंदनाची रोपे व झाडे पूर्णपणे जळाली आहेत. काळवंडलेली जमीन आणि राखेचे ढीग या नुकसानीची तीव्रता स्पष्टपणे दर्शवत आहेत.

धर्मेश रिंगे यांनी अनेक वर्षे परिश्रम घेऊन चंदन बाग विकसित केली होती. चंदनासारख्या मौल्यवान वृक्षांची लागवड करून भविष्यात उत्पन्नाचे साधन निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र वनव्यामुळे त्यांच्या आशांवर पाणी फिरले आहे. आर्थिक नुकसानाबरोबरच मानसिक धक्काही मोठा असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील शेतकरी आधीच अवकाळी पाऊस, दुष्काळ, नैसर्गिक संकटे यांचा सामना करत असताना आता मानवनिर्मित वनव्याचे संकट अधिक गंभीर ठरत आहे.

अनेकदा निष्काळजीपणे किंवा जाणूनबुजून लावलेल्या आगीमुळे वनवे पेट घेतात आणि त्याचा फटका शेतकरी व पर्यावरणाला बसतो. स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाने या घटनेची चौकशी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने मदत द्यावी, तसेच वनवे रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. "वनवा हा केवळ जंगलाचा प्रश्न नसून शेतकऱ्यांच्या आयुष्याशी संबंधित गंभीर प्रश्न आहे. एका क्षणातील निष्काळजीपणामुळे अनेक वर्षांची मेहनत राख होते," अशी भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT