अलिबाग; पुढारी वृत्तसेवा : गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरील रस्ते दुरुस्ती, खड्डे भरण्याची कामे शंभर टक्के पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज दिले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंत्री रविंद्र चव्हाण यांनी मुंबई- गोवा महामार्गावरील पळस्पे ते इंदापूर रस्त्याचा पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी संबधितांना यांसंबंधी सूचना दिली.
मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज पनवेल येथून आपल्या दौऱ्याची सुरुवात केली. रायगड जिल्हयातील या पाहणी दौऱ्यात कासू, नागोठणे, वाकण फाटा, खांब, वरसगाव फाटा, इंदापूर आदी ठिकाणी जावून रस्ता दुरुस्तीच्या कामांची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. या भागातील अनेक परिसरांमध्ये पावसामुळे दुरावस्था झालेल्या काही रस्त्यातील खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. हे खड्डे बुजविण्यासाठी "रेडीमिक्स" या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. हे तंत्रज्ञान कशा पध्दतीने रस्त्यांमधील खड्डे बुजवतात याचे प्रात्यक्षिकही यावेळी दाखविण्यात आले. तसेच कोणत्याही परिस्थितीत गणेश उत्सवापूर्वी रस्त्याची दुरुस्ती करुन रस्ता वाहतुकीसाठी सुसज्ज करण्याचे सक्त आदेश मंत्री चव्हाण यांनी संबंधित विभाग व कंत्राटदारास यावेळी दिले.
कोकणवासीयांचे आराध्य दैवत असणारे श्रीगणेश गणनायकायाचे आगमन अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपलेले आहे. या पार्श्वभूमीवर कोकणात येणाऱ्या ग्रामस्थांचा महामार्गावरून सुखरूप प्रवास होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्व प्रयत्न सुरु आहेत, असे मंत्री चव्हाण यांनी महाड येथील महामार्गावरील एका हॉटेलमध्ये भोजनाकरिता थांबले असता 'दैनिक पुढारी'शी बोलताना सांगितले.
दरम्यान, पनवेल ते इंदापूर मार्गाची वारंवार होणारी नादुरुस्ती लक्षात घेऊन विशेष योजनेद्वारे हा मार्ग पुढील पावसाळ्यापूर्वी सिमेंट काँक्रीटचा करण्याबाबतचा निर्णय शासन स्तरावर झाला आहे. याबाबतची अत्यावश्यक असणारी कार्यवाही नजीकच्या दिवसात पूर्ण होऊन तातडीने कामे सुरू होतील, असेही चव्हाण यांनी सांगितले.
रस्ता दुरुस्ती संदर्भात कोणतेही कारण न सांगता रस्ता जोडणे, पेव्हर ब्लॉक टाकणे आदी संबंधित कामे तातडीने संपवावीत. केवळ गणेशोत्सव नव्हे तर त्यापुढेही काही काळ रस्ते चांगले राहतील, अशी दुरुस्ती करून कामास गती द्यावी. याशिवाय महामार्गाचे राहिलेले काम पावसाळा संपताच तातडीने हाती घेऊन पूर्ण करावे, असेही त्यांनी निर्देश संबंधित विभागाला दिले. तसेच रस्त्यावर अडथळा होऊन वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी पोलीस विभागाने काळजी घ्यावी, अशी सूचनाही मंत्री चव्हाण यांनी यावेळी जिल्हा पोलीस विभागाला दिली.
मुंबई – गोवा महामार्गावरील काँक्रिटीकरणाचे काम सध्या युध्द पातळीवर सुरु आहे. परंतू, या संदर्भात काही प्रकरणे कोर्टात असल्यामुळे कामाच्या प्रगतीमध्ये अडचण निर्माण होत आहे. तरीही, येत्या डिसेंबर अखेरपर्यंत या मार्गातील सर्व अडचणी दूर करुन संपूर्ण मुंबई – गोवा महामार्ग काँक्रिटीकरण पूर्ण होईल,असा विश्वास मंत्री चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी आमदार भरत गोगावले, आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता रुपाली पाटील, अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे, राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक आणि इतर अधिकारी उपस्थित होते.