खारघर : सचिन जाधव
मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले की सर्वात प्रथम नवी मुंबईतील सर्व्हिसबार व ऑर्केस्ट्रा बारचा मुद्दा चर्चेला येतो. नवी मुंबई शहरातील ऑर्केस्ट्रा बार 23 फेब्रुवारी पासून अचानक पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहेत. या बंदी बाबतचा कोणताही लिखित आदेश शासनाकडून नाही. शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी अधिवेशनात पनवेल येथील रस्त्या वरील बारचा लखलखीत बार ,गोंगाट ,वाहतूक अडथळा अशी मांडणी केली . अधिवेशनात बारचा उल्लेख करताच इकडे नवी मुंबई पोलिस दलात खळबळ उडाली.कोणताही लेखी आदेश न काढताच नवी मुंबईतील हे बार हॉटेल्स बंद करण्याचा अलिखित फतवा निघाला आणि त्यांची तत्काळ अंमलबजावणी करण्यात आली. परिणामी नवी मुंबईतील सर्व्हिस बार आणि ऑर्केस्ट्रा बारचा मुद्दा आता सर्वत्र तापला आहे. सर्व शासकीय परवानग्या रितसर शासनशुल्क भरुन घेऊन चालू असणारे सर्व्हिस बार आणि ऑर्केस्ट्रा बार हॉटेल अचानक बंद पडल्यामुळे याचा परिणाम नवी मुंबईतील हॉटेल उद्योगासह,ओला वाहक,रिक्षा चालक तसेच छोट्या व्यावसायिकांवर झाला आहे.
नवी मुंबईतील सर्व्हिस बार तसेच ऑर्केस्ट्रा बार यांना परवानगी देत असताना महिला नोकर नामा हे राज्य उत्पादन शुल्क कार्यालय शासकीय चलन भरून घेऊन परवाना देत असते. राज्य उत्पादन शुल्क आणि विभागीय स्तरावरील सर्व परवानग्या घेऊनच हा व्यवसाय चालू होते. मग ते बेकायदेशीर कसे?असा प्रश्न हॉटेल चालक व मालक यांनी उपस्थित केला आहे.मुळात सर्व प्रकारची परवानगी घेऊन चालू असणारे सर्विस बार तसेच ऑर्केस्ट्रा बार हे नेहमी अधिवेशन काळात बंद का होतात ?.मार्च महिना आहे, शासनाचे रितरस शुल्क राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात भरणा करणे मार्च अखेर भरणे आवश्यक आहे.हॉटेल बंद आहेत.मग परवाना नूतनीकरण करायचे कसे? असाही प्रश्न हॉटेल चालकाना पडला आहे.
नवी मुंबईतील सर्व्हिस बार तसेच ऑर्केस्ट्रा बार बंद असतानाच, त्या उलट महाराष्ट्रात मुंबई आणि मुंबईची सर्व उपनगरे ,सोलापूर,ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड,कल्याण डोंबिवली,उल्हासनगर, सह उर्वरित रायगड जिल्ह्यातील खोपोली रोड वरील असणारे ऑर्केस्ट्रा बार हॉटेल्स मात्र सुरु आहेत. फक्त नवी मुंबईतील अधिकृत सर्व्हिस बार तसेच ऑर्केस्ट्रा बार वरच आक्षेप का ?असा प्रश्न हॉटेल मालक उपस्थीत करत आहेत. आजचे विरोधी पक्षातील नेते हे सत्ताधारी होते त्यावेळी मुंबईसह उपनगरातील सर्विस बार सह ऑर्केस्ट्रा बार नियमीत चालू होते. सरकार बदलते कायदे तेच आहेत,मग याचा फटका फक्त नवी मुंबईतील हॉटेल चालकाना का? अशा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
नवी मुंबईतील 98 अधिकृत सर्व्हिस बार व ऑर्केस्ट्रा बारमधील किमान 4000 हून अधिक लोककलाकार नवी मुंबई पोलिस दलाच्या या निर्णयामुळे गेल्या महिनाभरापासून बेरोजगार झाले आहेत. महाराष्ट्र शासनाने नियमानुसार परवानगी दिलेली असतानाही नवी मुंबईतील सर्व बार गेल्या 23 फेब्रुवारी पासून बंद आहेत. यामुळे बारमधील कामगारांवर उपासमारीची वेळ आली असून त्यांच्या कुटुंबांपुढे गंभीर आर्थिक संकट उभे राहिले आहे. या सर्व ऑर्केस्ट्रा बार हॉटेल्सनी रितसर 32 लाख रुपये करमणूक कर पुढील 4 वर्षांसाठी नवी मुंबई पोलिस आयूक्त कार्यालयाला भरणा केलेला आहे. मात्र प्रत्यक्षात अलिखित आदेशान्वये ही सर्व बार हॉटेल्स बंद आहेत.
हॉटेल चालू करताना लागणाऱ्या गाळा परवाना,गुमास्ता परवाना,आरोग्य विभागाची परवानगी, अग्निशमन दल परवानगी, विज वितरण कंपनी परवानगी,राज्य उत्पादन शुल्क विभाग परवानगी,सार्वजनिक बांधकाम विभागांचा कडून साऊंड प्रफु परवाना,सहाय्यक पोलीस उपायुक्तांची साऊंड प्रुफ परवानगी, वाहन पार्किंग परवाना, नोकरनामा परवाना, जीएसटी प्रमाणपत्र,महानगर पालिका व्यवसाय परवाना अशा सर्व परवानग्या सर्व्हिस बार चालवणाऱ्या मालकांकडे आहेत.मग बंदची कारवाही का ? नवी मुंबई पोलिस मुख्यालयाकडून आलेल्या या अलिखित फतव्याचा आणि हजारो लोकांच्या पोटावर टाच येईल असा आदेश काढला कोणी हे ही कळत नसल्याचे हॉटेल व्यावसाय़िकांनी म्हटले आहे.
रायगड मधील परवाना धारक सर्व्हिस बार तसेच ऑर्केस्ट्रा बार यांना मद्यविक्री परवानगी,नोकरनामासह दिली आहे.सर्व्हिस बार व ऑर्केस्ट्रा बार बंद करा अथवा नोकरनाम्यामधील कामगाराना काढून टाका असे कोणतेही आदेश राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाकडून दिले गेलेले नाहीत. नियमानुसार मद्यविक्री चालू ठेवण्यास आमची कोणतीही हरकत नाही.रविकिरण कोल्हे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, रायगड