

रोहे : महादेव सरसंबे
रोहा तालुक्यात ठिकठिकाणी जत्रा, यात्रा उत्सवाला सुरुवात झाली.गावा गावातील जत्रा, यात्रा उत्सवाची सुरुवात होत असताना रोहा तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या भातसई येथील महादेवी मातेची ( महादाई ) पालखी उत्सव सोहळा 31 मार्च रोजी होत असून मुख्य भातसई यात्रा 1 एप्रिल रोजी होत आहे.
दोन दिवस भातसई येथील परिसरात महादेवी( महादाई ) मातेचा गजर होणार असून मंदिरात विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रम घेण्यात येणार आहे.मातेच्या दर्शनासाठी जिल्ह्यासह राज्यातील भाविक भातसई येथे दाखल होणार भक्तांची मांदियाळी भातसई येथे दिसून येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या अवचितगडाच्या पायथ्याशी अनेक पुरातन मंदिरे आहेत. त्यातीलच नवसाला पावणारी भातसई येथील महादेवी माता ( महादाई ) मंदिर होय. भातसई हे निसर्गाच्या कुशीत वसलेले टुमदार गाव होय. महाराष्ट्रात जी आदर्श गावे नावारूपास आली त्यातीलच भातसई हे गाव होय.
गावातील श्री महादेवीचे जागृत देवस्थान आहे. या देवस्थानची जुनी अख्यायिका सांगितली जाते. देवीच्या आख्यायिकामध्ये गावातील गुराखी आपल्या गुरांना चारण्यासाठी घेऊन गेला असता एका करवंदीच्या झुडपापाशी त्याला अवतरलेली देवी दिसली. नंतर ती अदृश्य झाली. परंतु नंतर ही श्री महादेवी माता सध्याच्या देवळाजवळ एका माळावर स्वयंभू देवीच्या रूपाने प्रकट झाल्याचे सांगितले जाते. पुढे या देवीला महादेवी असे ओळखू लागले. ही देवी भातसई येथील खरिवले घराण्यातील लोकांच्या व भक्तांच्या अंगामध्ये खेळते. गावात रोगराई संकटकाळी रक्षण करण्यासाठी मध्यरात्रीच्या सुमारास महादेवी आपला भाऊ श्री धावीर महाराज यांच्याबरोबर फिरत असत असे ग्रामस्थ सांगतात.
ही देवी खरीवले घराण्यातील भक्तगणांच्या अंगात संचारत असते. ही प्रथा अद्याप सुरू असून आता श्री चिंतामणी खरिवले (भगत) यांच्या अंगात देवी खेळते. (संचारते) परंतु मध्यंतरी शासनाने ही परंपरा (सुमारे सन 1950) बंद करण्याचे ठरवल्यानंतर कार्यक्रम ठिकाणी गावात पोलीस आले होते. यावेळी महादेवीचा साक्षात्कार झाल्याने ही परंपरा बंद न पडता पुढे आज पर्यंत चालू आहे.
चैत्र पौर्णिमेच्या आदल्या दिवशी देवीची आरास केली जाते. दिमाखदार पारंपारिक वाद्यवृंदावर पालखी काढली जाते. हा पालखी सोहळा संपूर्ण भातसई, कोपरा, झोळांबे, लक्ष्मीनगर आदी पंचक्रोशीतील गावांमध्ये ढोल ताशाच्या गजरात देवीची पालखी मिरवणूक काढली जाते.
श्री महादेवी मंदिराच्या पटांगणात सुमारे वीस फूट उंचीचा सिमेंट काँक्रीटचा स्टेज बनवला आहे. मानकरी मंडळी गळ टोचून घेणाऱ्या भक्तला सीडीवर चढवून मुख्य ठिकाणी आणले जाते. या ठिकाणी मधोमध सुमारे पाच फूट उंचीच्या खांबावर आडवा वीस फूट खांब वर्तुळात समांतर बसविलेला आहे. त्यास लाट असे म्हणतात. ही लाट जमिनीपासून 25 फूट उंचावर आहे. दोन टोकांना दोरखंड बांधून ते जमिनीकडे सोडलेले असतात. ते दोरखंड धरून लाट फिरवण्यासाठी दोन्ही बाजूस एक ते दोन माणसे व भक्तजन असतात. लाटेच्या एका टोकाला गळाला असलेला दोर बांधला जातो यावेळी लाटेवर भगत बसतो. त्यानंतर पूर्ण तयारी झाली की एक जण हाक देतो. हर हर हर महादेव ही हाक झाल्यावर गळ टोचून घेणाऱ्या व्यक्तीस अधांतरीत उचलले जाते. येथील लाट फिरवली जाते. गळ टोचून घेणाऱ्या भक्तास गळाला बांधलेल्या दोरीने गळ टोचलेल्या त्वचेच्या आधारावर टांगून घेऊन अधांतरी लोंबकळत्या अवस्थेत ठेवतात. पूर्वी पाच फेऱ्या फिरविल्या जात होत्या. आता फक्त एकच फेरी फिरवली जाते. हातात मोर पिसाचा पंचाळा वेताची छडी घेतलेल्या लाटे बरोबर फिरणारा गळी प्रत्येक फेरीस श्री महादेवी मातेला नमस्कार करीत असतो. हा प्रसंग पाहता भक्तगणांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा प्रसंग असतो.
यात्रेच्या दिवशी परिसरातील महादेवाच्या काठ्या ताशा, खालुबाजा या पारंपारीक वाद्यांवृदंवर गळ टोचणी या मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी मंदिरात येतात.गळ टोचणीचा कार्यक्रम हा या यात्रेचे मुख्य आकर्षण आहे. गळ टोचून घेणारा भक्त त्या रात्रीपासून उपवास करतो. जत्रेच्या प्रमुख विधीला येथूनच सुरुवात होते. श्री महादेवीचा गळ टोचून घेण्याचा मान पंचक्रोशीसह महाराष्ट्रातील भक्तांना दिला जातो. गळ टोचून घेण्यापूर्वी गळ टोचून घेणारा भक्त व त्याचे कुटुंबातील व्यक्ती देवी जवळ मनोभावे प्रार्थना करतात.