खोपोली : प्रशांत गोपाळे
मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर 3 फेब्रुवारी रोजी प्रोपेलीन गॅस टँकर उलटल्याने तब्बल 32 तास वाहतूक कोंडी झाली होती. या कालावधीत वाहनचालक तसेच प्रवाशांची गैरसोय झाली होती. त्यावेळी वसूल करण्यात आलेला टोल वाहन मालकांना परत करण्याबाबत, शासन आणि महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) सकारात्मक असून, येत्या आठ दिवसांत या बाबतची कार्यवाही पूर्ण करुन, टोल परत करण्यात येईल, अशी माहिती एमएसआरडीसीचे कार्यकारी अधिकारी राकेश सोनावणे यांनी दिली आहे.
मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर 3 फेब्रुवारी रोजीच्या 32 तास वाहतूक कोंडीत वाहनचालक तसेच प्रवाश्यांची गैरसोय झाली.मात्र या दरम्यान टोलवसूली करण्यात आली. मनसेने आक्रामक पवित्रा घेत टोलची रक्कम परत करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाहतूक सेनेने केली होती. त्या पार्श्वभूमीवर आज खालापूर टोलनाका येथे झालेल्या संयुक्त बैठकीत सोनावणे यांनी ही माहिती दिली आहे. मनसेच्या मागणीला यश आले असले तरी एक्सप्रेसवेवरील समस्या सोडविल्या नाहीतर मनसे पुन्हा खळखट्याक करेल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाहतूक सेनेचे अध्यक्ष आरिफ शेख यांनी यावेळी दिला आहे.
यावेळी आरआरबीचे वरिष्ठ अधिकारी जयवंत डांगरे, सुरेंद्र रावत, मनसेचे वाहतूक सेनेचे अध्यक्ष आरिफ शेख, उपाध्यक्ष अभिषेक दर्गे, सरचिटणीस प्रदीप वाघमारे, वाहतूक पोलीस उप अधीक्षक पुष्प लता दिघे, खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार, वाहतूक पोलीस उप निरीक्षक स्वप्नील पाटील यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पुढील काळात अशा घटना होणार नाहीत याबाबत उपाययोजना करण्यात येईल असे आश्वासन देत एक्सप्रेसवर महिलांसाठी स्वच्छतागृह,हिरकणी कक्ष,अपघात घडल्यावर गोल्डन हावर्समध्ये कोणत्या उपायोजना केल्या जातात याची माहिती एमएसआरडीसी व आयआरबीच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.
एक्सप्रेस वे वर शुक्रवार ते रविवारी अवजड वाहनांकडून टोल वसूल करून त्यांना तासंतास थाबविले जाते. त्यांना कोणत्याही प्रकारे सुविधा दिल्या जात नाहीत. त्यांच्याकडून टोल वसूल करू नये अशी विनंती यावेळी करण्यात आली. तरीही टोल वसुली होणार असेल तर मनसे स्टाईलने उत्तर दिले जाईल.अभिषेक दर्गे, उपाध्यक्ष, मनसे वाहतूक सेना