इंदापूर : यंदा 2 मार्चला होळी सण साजरा होत असून कोकणातील शिमगोत्सवासाठी मुंबई, पुणे, ठाणे तसेच गुजरात मधील सुरत येथून मोठ्या प्रमाणात चाकरमानी आपल्या गावी रवाना होणार आहेत. त्यामुळे 28 फेब्रुवारीपासूनच इंदापूर बाजारात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कोकणात जाणाऱ्या वाहनांचा मुख्य मार्ग असलेला मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 वर सध्या विविध ठिकाणी अपूर्ण कामामुळे, काही ठिकाणी रस्ता अरुंद यामुळे वाहतूक संथ गतीने सुरू आहे. परिणामी मुंबईहून चार पदरी मार्गाने येणारी वाहने इंदापूर बायपास जवळ एकेरी मार्गावर येतात. मोठी कोंडी निर्माण होते. शनिवार - रविवार सुट्ट्या त्यानंतर होळीची सलग सुट्टी यामुळे 28 फेब्रुवारीपासूनच खाजगीकार, प्रवासीबस, ट्रॅव्हल्स, दुचाकी तसेच जड वाहनांची संख्या वाढणार आहे. गेल्या 26 जानेवारीच्या वेळीही 3 ते 5 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र पहावयास मिळाले होते. आत्ताही अशीच परिस्थिती उद्भवण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
इंदापूर आठवडा बाजार शुक्रवार व लागून शनिवार - रविवार व होळीची सुट्टी यामुळे इंदापूरचे व्यापारी नागरिक व वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. दुकानदारांना माल पोहोचविण्यात अडथळे निर्माण होतात. तर रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक सेवांनाही विलंब होतो. वाहतूक कोंडीच्या वेळी काही वाहन चालकांकडून बेशिस्त ओव्हर टेक, रस्त्याच्या कडेला पार्किंग, उलट दिशेने वाहन घालणे असे प्रकार घडतात. त्यामुळे कोंडी अधिकच वाढते.
होळी हा आनंदाचा सण असला तरी दरवर्षी होणारी वाहतूक कोंडी इंदापूरकरांना डोकेदुखी ठरते. यंदा 28 फेब्रुवारीपासूनच प्रशासनाने दक्षता नाही घेतली तर 2 मार्चच्या होळीपर्यंत परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे.
सणासुदीच्या काळातील ही वाहतूक कोंडी कधी संपणार ? रखडलेला मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 च्या कामाला गती देऊन आणि नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करूनच या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघू शकतो अशी सर्व सामान्यांची व पर्यटकांची अपेक्षा आहे.
नियमभंग करणाऱ्या वाहनचालकावर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. दंडात्मक कारवाई तसेच पोलीस बंदोबस्त वाढविणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.