महाड: रायगड जिल्हा परिषदेच्या राजकारणामध्ये महायुतीने राज्याप्रमाणेच एकत्र येणे गरजेचे असून एकत्र न आल्यास भविष्यात येणाऱ्या लोकसभा विधान परिषद व अन्य निवडणुकांवेळी वेगळा विचार करावा लागेल असे खडे बोल मंत्री भरत गोगावले यांनी मित्रपक्षांना सुनावले आहेत.
गुरुवारी महाड येथे रायगड जिल्हा परिषदेमध्ये सर्वाधिक सदस्य निवडून येऊन देखील सत्तेमध्ये सहभागी होण्याबाबत निर्माण झालेला गुंता संदर्भात गुरुवारी मंत्री भरत शेठ गोगावले यांनी महाड येथील श्री वीरेश्वर महाराजांच्या छबिना दरम्यान पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना स्पष्ट उत्तरे दिली. राज्याप्रमाणेच रायगड जिल्हा परिषदेमध्ये ही महायुतीने एकत्र येणे आवश्यक असून विरोधात लढल्यास परिणाम दिसून आले आहेत.
एकत्र न आल्यास आमची आवश्यकता नसल्यास भविष्यात येणाऱ्या लोकसभा विधान परिषद निवडणुकी करता वेगळा विचार करावा लागेल असे त्यांनी स्पष्ट केले.
मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या या स्पष्ट वक्तव्यामुळे रायगड जिल्हा परिषदेतील महायुतीच्या संभाव्य युतीबाबत भविष्यात काय होते याकडे जिल्ह्यातील तमाम राजकीय निरीक्षकांसह नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
रवींद्र चव्हाण- सुनील तटकरे एकत्र आल्याचा शिवसेनेवर परिणाम नाही
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची गेल्या काही दिवसातील जवळीकतेचा शिवसेनेवर परिणाम होणार नाही. त्यांनी आणखी कोणाबरोबर जवळीक करावी हा त्यांचा प्रश्न आहे, असंही त्यांनी ठामपणे सांगितले.
ठाण्यातील एकनाथ शिंदे विरुद्ध रवींद्र चव्हाण वादाचा फटका रायगडला बसतोय का असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, शिवसेनेला अशा कोणत्याही गोष्टीचा फरक पडत नसून शिवसेना आताही खंबीर व मजबूत आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाड चवदार तळे सत्याग्रहाला पुढील वर्षी होणाऱ्या शतकपूर्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाने 55 कोटी 79 लक्ष रुपये मंजूर केले असून या निधी मधून चवदार तळ्यातील पाण्याची स्वच्छता या प्रमुख कामासह फिल्टरेशन प्लांट संरक्षण भिंत आदी कामे केली जाणार असून ती पुढील वर्षापर्यंत पूर्ण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महाडचे आराध्य दैवत असलेल्या श्री वीरेश्वर महाराजांच्या मंदिरासमोरील तलावाचे गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेले काम येत्या काही दिवसात पूर्णत्वास जाईल. या कामी ज्यांनी निधी दिला त्यांचे आभार मानतानाच राहिलेली कामे पुढील वर्षांच्या यात्रेपर्यंत पूर्ण करु, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.
पालकमंत्रीपदासाठी साकडे
मागील वर्षभरापासून प्रलंबित असलेल्या रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाकरिता महाडमधील शिवभक्तांनी महाडचे आराध्य दैवत असणाऱ्या श्री वीरेश्वराला आज साकडे घातले असून हे साकडे निश्चित यशस्वी होईल असा विश्वास गोगावलेंनी व्यक्त केला.
शासकीय पोलीस मानवंदनेचं चौथे वर्ष
महाडचे आराध्य दैवत म्हणून परिचित असलेल्या श्री वीरेश्वर महाराजांना शासकीय पोलीस मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी मंत्री भरत गोगावले, नगराध्यक्ष सुनील कविस्कर, सरपंच दीपक वारंगे, उपसरपंच नाना नातेकर, महाडचे पंचायत समितीचे सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. श्री वीरेश्वर महाराजांना शासकीय पोलीस मानवंदना देण्याचे हे चौथे वर्ष असून यंदा या
या सलामीचे नेतृत्व पीएसआय रवी दर्जे यांनी केले. त्यांच्या समवेत रायगड पोलीस दलाचे आठ सन्मान गार्ड यामध्ये सहभागी झाले होते.
गोगावले यांच्या प्रयत्नातून श्री वीरेश्वर महाराजांना शासकीय पोलीस मानवंदना देण्याची परंपरा सुरू झाली आहे.