पुणे : उष्णतेमुळे पाण्याचा तुटवडा, हंगाम संपल्याने रोडावलेले उत्पादन, तसेच इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्चात वाढ झाल्याने फळभाज्यांसह पालेभाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सध्या बाजारात बहुतांश फळभाज्यांच्या किलोचे भाव शंभरावर पोहोचले आहेत, तर पालेभाज्यांच्या प्रतिजुडीचे दर वीस रुपयांच्या पलीकडे गेले आहेत. पुणे शहरातील घाऊक बाजारात पुणे विभागातील पुणे, सोलापूर, सांगली, सातारा व कोल्हापूर भागातून फळभाज्या व पालेभाज्यांची आवक होते.
याखेरीज कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गुजरात येथून हिरवी मिरची, हिमाचल प्रदेश येथून मटार, आंध्र प्रदेश व तमिळनाडू येथून शेवगा, कर्नाटक येथून तोतापुरी कैरी व घेवडा, तर गुजरात, मध्य प्रदेशातून लसूण बाजारात दाखल होतो. परराज्यात व पुण्यातील बाजारपेठांमध्ये मिळणारे दर यानुसार बाजारात आवक होते. पुणे विभागासह गुजरात व लातूर येथील कोथिंबीर बाजारात दाखल होते.
यामुळे बसतोय दरवाढीचा फटका
शेतमालाचे दाखल होणारे प्रकार
फळभाज्या 47
पालेभाज्या 21
फळे 74
गूळ-भुसार 74
सुकामेवा 22
फुले 42
अतिउष्णतेमुळे निर्माण झालेला पाण्याचा तुटवडा, तर काही ठिकाणी अवकाळी पावसाच्या तडाख्याने कोथिंबीर, मेथीसह अन्य पालेभाज्यांच्या उत्पादनासह दर्जावर परिणाम झाला आहे. बाजारात पालेभाज्यांची आवक घटली असून, दर्जेदार मालाचे प्रमाण कमी आहे. त्या तुलनेत मागणी जास्त असल्याने पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे.
चरण वणवे, भाजी विक्रेता
पाण्याच्या तुटवड्याने उत्पादनात घट होऊन मागणीच्या तुलनेत आवक रोडावल्यास दरात वाढ होते. या खेरीज फळभाज्यांना कमी दर मिळाल्यास शेतकरी पिके काढून टाकतात; तसेच साठवणूक होणार्या मालास कमी दर मिळाल्यास शेतकरी त्याची साठवणूक करण्यास सुरवात करतात. त्यामुळे बाजारातील आवक घटून त्याचा परिणाम दरवाढीवर होतो.
अमोल घुले, अडते, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड
हेही वाचा