वाडा : पुढारी वृत्तसेवा : चासकमान धरणाच्या पाण्यात गेलेले जुना वाडा आता पुन्हा दिसू लागले आहे. त्यामुळे अनेकांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे.
खेड तालुक्याच्या पश्चिमेस जवळपास 28 किलोमीटर अंतरावर असलेले गाव चासकमान जलशयात गेले असले तरी आज गावच्या आठवणी ताज्या असून जलाशयाचे पाणी कमी झाल्यानंतर पाण्यात गेलेले वाडा गाव पुन्हा अनेकांच्या आठवणींना उजाळा देताना दिसत आहे. गावातील त्याकाळी दगडी बांधकाम असलेली मंदिरे आजही अनेकांना आपल्याकडे आकर्षित करत आहेत.
दरवर्षी उन्हाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात धरणातील पाणीसाठा कमी होऊन जलाशयात गेलेल्या घरांच्या स्मृती व मंदिरे पाण्याबाहेर आल्याने वाडा गावच्या नागरिकांना आपल्या जन्मभूमीला पाहण्याची संधी लाभली असून नागरिकांसह पर्यटक या ठिकाणी गर्दी करू लागले आहेत.
या जलाशयात गडप झालेली ग्रामदैवत धर्मराज मंदिर, मारुती मंदिर, विठ्ठल रखुमाई मंदिर, शनी मंदिर, राम मंदिर, लक्ष्मी नारायण मंदिर, गणपती मंदिर, भीमाशंकर मंदिर, दत्त मंदिर ही मंदिरे पाण्यातून वर येत आहेत. हे बघणे नागरिकांसाठी पर्वणी ठरते आहे. अनेक वर्षे होऊनदेखील ही मंदिरे आजही सुस्थितीत आहेत हे विशेष.