पुणे : पुढारी वृत्तसेवा
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत पक्षाला यश मिळाले नाही, तर पक्षाने दिलेली पदे काढून घेईन,' असा इशारा उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांना भर मेळाव्यात दिला. कार्यकर्त्याला ताकद देण्यासाठी पक्षाकडून पद मिळते,त्यानंतर अनेक जण काम करत नाहीत. मात्र, पदे जशी देता येतात, तशी ती काढूनही घेता येतात, हे लक्षात घ्या असेही अजित पवारांनी सुनावले.
जिल्हा राष्ट्रवादी काँगेसच्या वतीने शुक्रवारी पुण्यात 'शिलेदार निष्ठेचे' या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पवार बोलत होते. शरद पवार यांच्याशी अनेक वर्षांपासून एकनिष्ठ असलेल्या जिल्ह्यातील ज्येष्ठांचापवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. आमदार दिलीप मोहिते पाटील, आमदार सुनील शेळके, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी आमदार पोपटराव गावडे, सूर्यकांत पलांडे, जगन्नाथ शेवाळे, रमेश थोरात, सुरेश घुले, प्रकाश म्हस्के, संतोष चाकणकर, केशर पवार, सविता दगडे, वैशाली नागवडे आदींसह जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
पवार म्हणाले, 'विधानसभा निवडणुकीत भोर, पुरंदरमध्येही आम्ही मित्रपक्षाच्या उमेदवाराला साथ दिली. दौंडचा उमेदवार आला असता, तर संपूर्ण ग्रामीण भागात आघाडीचे संपूर्ण वर्चस्व निर्माण झाले असते. भोर तालुक्यात अद्यापही म्हणावे तसे काम आणि ताकद दिसत नाही. या संदर्भात वेळ देऊन बांधणी करणे गरजेचे आहे. पुरंदरमध्ये नेते जास्त आहेत. मात्र, निवडणुकीत यश मिळत नाही. जो चार उमेदवार निवडून आणेल त्यालाच पद देण्याचा विचार आहे.'