वाघोली: उतारवयात जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या 91वर्षीय आजीबाईंची हृदयस्पर्शी व्यथा दै. ‘पुढारी’ने नुकतीच मांडली. त्यानंतर वाघोली परिसरात मानवतेचा झरा वाहू लागला असून, समाजातील अनेक दानशूर व्यक्ती या वृद्ध दाम्पत्याच्या मदतीसाठी सरसावले आहेत.
वाघोली परिसरात राहणाऱ्या आजरबाई सध्या संघर्षमय जीवन जगत आहेत. त्यांच्या पतीला अर्धांगवायू झाला असून, औषधे घेण्याइतके पैसेही त्यांच्याकडे नाही. वाघोली पोलिस या वृद्ध दाम्पत्याला वेळोवेळी मदत करीत आहेत. याबाबत दै. ‘पुढारी’ने ‘खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन’ या आशयाचे वृत्त नुकतेच प्रसिद्ध केले होते. त्यात या दाम्पत्याचा उतारवयातील संघर्ष आणि वाघोली पोलिसांकडून त्यांना होणारी मदत याबाबत वृत्तांकन केले होते. त्यानंतर परिसरातील दानशूर व्यक्तींकडून या दाम्पत्याला मदतीचा ओघ सुरू झाला आहे.
सामाजिक कार्यकर्त्या मीना सातव पाटील यांनी पुढाकार घेत या दाम्पत्याला पुढील चार ते पाच महिने पुरेलइतके किराणा साहित्य देत मदतीचा हात पुढे केला आहे. शिरूर तालुक्यातील न्हावरे येथील प्रकाश बाबूराव जाधव यांनी शेंगदाणे, चहा, साखर यांसह विविध जीवनावश्यक वस्तू या दाम्पत्याला दिल्या. स्वरूप गिरमकर यांनी औषधे, गोळ्या उपलब्ध करून दिल्या आहेत.
दरम्यान, वाघोली पोलिसांच्या सेवाभावी कार्याने या मदतीच्या साखळीला दिशा दिली. पोलिस हवालदार संभाजी बेंद्रे यांनी औषधोपचारासोबतच आजीबाईंना नऊवारी साडी देत देखील मदत करण्याचे आश्वासन दिले. जीके फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष संदीप कटके यांनी देखील मदतीसाठी पुढाकार घेतला असून, आवश्यक ती मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
एकेकाळी आधारासाठी हतबल झालेल्या या आजीबाईंना आता समाजाचा खंबीर आधार मिळू लागला आहे. या वृद्ध दाम्पत्याला अजूनही मदत देणार असल्याचे प्रकाश जाधव यांनी सांगितले. मदतीचा ओघ पाहून या दाम्पत्याने दै. ‘पुढारी’चे आभार मानले आहेत.