Veer Dam Pudhari
पुणे

Veer Dam Water Release: वीर धरण १०० टक्के भरले; निरा नदीत २४ हजार क्युसेकहून अधिक पाण्याचा विसर्ग

नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; निरा खोऱ्यातील धरणसाठा ८० टक्क्यांवर

पुढारी वृत्तसेवा

निरा: निरा खोऱ्यातील निरा देवघर, भाटघर आणि गुंजवणी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या ३-४ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वीर धरणातील पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी वीर धरण १०० टक्के भरल्याने शुक्रवारी (दि. २४) सायंकाळी ४ वाजता धरणाचे ५ दरवाजे ४ फुटांनी उचलून निरा नदीत २४ हजार २८५ क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला, अशी माहिती वीर धरण उपविभागाच्या सूत्रांनी दिली.

धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाल्याने गेल्या पंधरवड्यात दुसऱ्यांदा निरा नदीला पूर आला असून, नदीकाठावरील प्रसिद्ध दत्तमंदिरातही पाणी शिरले आहे. मंदिराच्या पायऱ्या पाण्याखाली गेल्याने भाविकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जून महिना संपून जुलैचा पहिला आठवडा उलटल्यानंतरही पावसाने ओढ दिल्याने वीर धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र, गेल्या पंधरवड्यात झालेल्या पावसामुळे धरणसाखळीतील पाणीसाठ्यात वाढ झाली आणि निरा उजवा व डावा कालवा सुरू झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून निरा देवघर, भाटघर आणि गुंजवणी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे चारही धरणांतील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. वीर धरणात उपलब्ध पाणीसाठा ९.४०८ टीएमसीवर पोहोचल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. सध्या निरा खोऱ्यातील चारही धरणांमध्ये एकूण ३८.८३३ टीएमसी पाणीसाठा असून, धरणे ८०.३५ टक्के भरली आहेत. गतवर्षी याच दिवशी हा साठा ४०.१२४ टीएमसी म्हणजे ८३.०२ टक्के होता.

शुक्रवारी सकाळपासून धरणातील पाण्याची पातळी वाढत गेल्याने टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढविण्यात आला. दुपारी अडीच वाजता धरणातून २३ हजार १८५ क्युसेक आणि विद्युतगृहातून १ हजार १०० क्युसेक, असा एकूण २४ हजार २८५ क्युसेक विसर्ग निरा नदीत सोडण्यात आला. हा विसर्ग पुढे पंढरपूर येथील चंद्रभागा नदीला मिळत असल्याने आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर त्यालाही महत्त्व प्राप्त झाले आहे.

नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे

वीर धरणातील पाण्याची आवक वाढल्यामुळे गुरुवारी (दि. २३) रात्रीपासून टप्प्याटप्प्याने निरा नदीत विसर्ग सुरू करण्यात आला आहे. शुक्रवारी दुपारी २.३० वाजल्यापासून विसर्ग वाढवून तो २४ हजार २८५ क्युसेक करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन वीर धरण उपविभागाचे उपविभागीय अधिकारी राहुल मिसाळ यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT