डॉ. दीपक बीडकर
जिजाऊ आईसाहेब, बालशिवाजीने पुण्याची भूमी सुवर्ण नांगराने नांगरली. पुणे मोठे झाले. पुढे पुणे बाजारपेठ वसविण्याचा विचार पेशव्यांनी केला तेव्हाच ठिकठिकाणाहून व्यापारी, हरहुन्नरी मंडळी पुण्यात वसवली गेली. ती इथलीच झाली. 'पुणेकर' झाली. नशीब आजमावायला पुढेही अनेक जण येत राहिले. त्यामुळे पुण्यात हा परका, हा बाहेरचा… असा भेदभाव नव्हता. पुण्यात चोखंदळपणा आणि गुणवत्तेची पारख होते. मग ती व्यक्ती तिच्या अंगभूत कलाकौशल्याने आपलीशी केली जाते. दक्षिणेतून, उडपीतून आलेले हॉटेलियर, साऊथ इंडियन चव पुण्याने आपलीशी केली त्याला आता अनेक दशके झाली. पण, त्यात सर्वात हृदयस्थ पुणेकर ठरले ते हॉटेल वैशाली चालवणारे जगन्नाथ शेट्टी!
पुण्याचा फर्ग्युसन महाविद्यालयाचा रस्ता सदाहरित वाटण्यास खुद्द फर्ग्युसन कॉलेज, रानडे इन्स्टिट्यूट, ब्रिटिश लायब्ररी अशा अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. गुडलक, वैशाली, रुपाली अशी अनेक रेस्टॉरंट आहेत. त्यात सर्वाधिक लाडके ठरले ते हॉटेल वैशाली. मी 1989 ला प्रथम हे हॉटेल पाहिले तेव्हा फर्ग्युसनच्या मेसमध्ये सायकल चालवत, कधी चालत डबा आणायला जात असे. वैशालीत जाण्याचा विचारही मनात नव्हता. 1993 ला गरवारे कॉलेजच्या मैत्रिणींना त्यांच्या मित्राने 'वैशाली'ला भेटायला बोलावले, तेव्हा सोबत करवला न्यावा, भरवशाचा साथीदार न्यावा, तसा मी गेलो होतो.
कटलेटने सुरू झालेला हा प्रवास पुढे इडली सांबार, कॉफी, पुण्यभूषण दिवाळी अंक प्रकाशन असा चालूच राहिला. सुधीर गाडगीळपासून नावाजलेल्या संपादकांपर्यंत अनेकांना तेथे पाहिल्यावर मला ते सेलिब्रिटी रेस्टॉरंट वाटायचे. जगन्नाथ शेट्टी यांचे असणे-दिसणे अगदी तेव्हापासूनचे! वैशालीचे रम्य वातावरण बदलले नाही, सांबारची चव बदलली नाही… जगन्नाथ शेट्टीही बदलले नाहीत. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत ते पुणेकर राहिले. पुणेकरांच्या आस्थेचा विषय राहिले. अनेक लोकप्रिय कटट्यांना त्यांनी आस्थेने जागा पुरवली.
जगन्नाथ शेट्टी यांची गुणग्राहकता, दानशूरता, चोखंदळपणा, अफाट मेहनत सर्वांनाच ज्ञात आहे. पुणे शहरावरचे त्यांचे प्रेम, हॉटेलमधल्या सहकार्यांप्रती असलेली कृतज्ञता कौतुकाचा विषय झाली. जगन्नाथ शेट्टी अस्सल पुणेकर व्हायला इतके पुरे होते. कोविडकाळात सर्व हॉटेल बंद असताना पुणेकरांना वैशालीचा विरह झाला. मग पार्सलसेवेला परवानगी मिळाली. तेव्हा तिथली रांग सर्वांनी पाहिली आहे.
पुण्यभूषण दिवाळी अंक 2020 चे प्रकाशन वैशालीमध्ये करायची अनोखी कल्पना डॉ. सतीश देसाई यांनी मांडली. जगन्नाथ शेट्टी यांनी आनंदाने होकार दिला. कोविडकाळातील नियम पाळून वैशाली हे जणू लग्नघर बनले. ऐन दसर्या-दिवाळीच्या काळात! महापौर मुरलीधर मोहोळ आले होते. पुण्यभूषण अंकाचे पहिले पान जगन्नाथ शेट्टी यांना समर्पित असल्याने तेच उत्सवमूर्ती होते. थोडेसे थकलेले शेट्टी हसून सर्वांशी संवाद साधत होते. पुणेकरांचे कौतुक विनम्रतेने स्वीकारत होते. मलाही त्यावेळी त्यांच्याशी संवाद साधता आला. तो फोटो आता स्मृती बनून झाला असला तरी 'मर्मबंधातील ठेव'ही झाला आहे !