पुणे: 'खाद्यपदार्थांप्रमाणेच मद्य आणि मद्यार्क नसलेल्या पेयांमध्ये भेसळीच्या तक्रारी वाढल्या असून, गावठी दारूमध्ये विषारी रसायन मिसळल्याने मृत्यू झाल्याच्या घटना पुण्यात घडल्या आहेत. पेयजलांची गुणवत्ता, त्याचे उत्पादन आणि लेबलिंग, यावर आमचे बारकाईने लक्ष आहे. दूध, पनीर, खाद्यतेलांप्रमाणेच 'अल्कोहोलिक' आणि 'नॉन-अल्कोहोलिक' पेयांचीही तपासणी करणार असून, कोणतीही तडजोड खपवून घेणार नाही,' असा इशारा अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला.
'पुणे लोकल कनेक्ट' आणि 'माय जनसेवक' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'भविष्यवेध : संवाद भविष्याचा' या उपक्रमांतर्गत 'अनस्टॉपेबल तुकाराम' या विशेष मुलाखत कार्यक्रमात ते बोलत होते. मुंढे म्हणाले, 'खाद्यपदार्थांची गुणवत्ता आणि सुरक्षितता, हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. चरबीयुक्त, खारट आणि साखरयुक्त पदार्थ खाल्ल्याने उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणासारखे आजार होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळेच कायद्याने ठरवून दिलेल्या मानकाप्रमाणेच खाद्यपदार्थ असले पाहिजेत. भेसळयुक्त अन्न, विषारी ताडी-दारू आणि निकृष्ट अन्नपदार्थ नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहेत.
अन्न उद्योगाने नियमांचे पालन करणे, एफडीएने नियमन करणे आणि ग्राहकांनी सजग राहणे यातूनच ही व्यवस्था बदलेल. यशस्वी व्यक्ती दिसते; मात्र त्या यशामागे असलेला संघर्ष, अपयश आणि अनेक रात्रींची मेहनत फार कमी जण पाहतात. त्यामुळे अपयश आले म्हणून खचून न जाता त्यातून धडा घेत पुन्हा उभे राहण्याची तयारी तरुणांनी ठेवली पाहिजे. 'केवळ यशाकडे पाहू नका; त्या यशामागे असलेले अपयश आणि संघर्षही समजून घ्या,' असा प्रेरणादायी संदेश मुंढे यांनी यावेळी तरुणांना दिला.
मुंढे म्हणाले, यशाचे श्रेय स्वतःकडे घेणे आणि अपयशाची जबाबदारी दुसर्यावर ढकलणे म्हणजे नेतृत्व नव्हे. जबाबदारी स्वीकारणे, व्हिजन स्पष्ट करणे, स्वतः पुढे चालून मार्ग दाखवणे आणि इतरांना सोबत घेऊन जाणे, हीच खरी लीडरशिप आहे. मागील अधिकाऱ्यामुळे समस्या निर्माण झाली, असे सांगून जबाबदारी झटकण्याऐवजी आपण ज्या पदावर आहोत, त्याची जबाबदारी स्वीकारून समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एखादा अधिकारी बदलल्यानंतर व्यवस्था कोलमडू नये, यासाठी व्यक्तीपेक्षा व्यवस्था सक्षम असणे आवश्यक आहे. मिलिंद कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर विरेश आंधळकर यांनी प्रास्ताविक करून आभार मानले.
जंक फूडबंदीचा 'ॲक्शन प्लॅन'च तयार नाही
शाळेच्या ५० मीटर परिसरातील जंक फूड विक्रेत्यांवर कारवाई करून त्यांचे परवाने रद्द करण्यात येतील, असे मुंढे यांनी सांगितले. मात्र, त्यासाठी स्वतंत्र पथके, नियमित तपासणी किंवा निश्चित कार्यपद्धतीबाबत त्यांनी स्पष्ट माहिती दिली नाही. शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षण विभाग, पालक आणि एफडीए यांच्या माध्यमातून कारवाई केली जाईल, असे सांगत त्यांनी अंमलबजावणीची जबाबदारी या यंत्रणांवर सोपवल्याचे चित्र आहे. तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित जंक फूड विक्रेत्यावर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.