

चाकण: पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा मूळ मार्ग पूर्ववत करावा या मागणीसाठी रविवारी 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनाचे औचित्य साधून उत्तर पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी तीव्र चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
पुणे नाशिक महामार्गावर चाकण मध्ये तळेगाव चौकात खेडचे आमदार बाबाजी काळे यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले. यावेळी महामार्ग रोखण्याचा प्रयत्न करणारे अदोलक अ पोलीस यांच्यात जोरदार झटापट झाली. पोलिसांनी आक्रमक आंदोलकांना रोखण्यासाठी बळाचा वापर करत महामार्गावर जाणार्या अनेक कार्यकर्त्यांची उचलबांगडी करत यांना ताब्यात घेतले. यानंतरही आंदोलकांनी पुणे नाशिक महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
चाकण मध्ये पोलिसांनी अक्षरशः पोलीस बळाचा वापर करत कार्यकर्त्यांना महामार्गावरून ढकलून बाजूला करण्याचा प्रयत्न केल्याचे चित्र पहावयास मिळाले. सुमारे १५ मिनिट हि झटापट सुरु होती. चाकण मधील आंदोलनाचा पूर्व इतिहास पाहता पोलिसांनी कुठल्याही स्थितीत महामार्ग रोखला जाऊ नये याची याची कसोशीने खबरदारी घेतली. सुरुवातीला माणिक चौक चाकण येथे जमलेले आंदोलक पुणे नाशिक महामार्गावर येण्यास निघाल्यानंतर पोलिसांनी तळेगाव चौकात एका बाजूला सर्वाना आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना कडे घातले. आंदोलक रस्त्यावर जाऊ शकणार नाहीत याची खबरदारी घेतली.
यावेळी जोरदार झटापट झाली. अखेरीस महामार्गावर आलेल्या आंदोलकांना आमदार बाबाजी काळे यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर पोलिसांनी आमदार बाबाजी काळे यांना आंदोलन स्थळावरून बाजूला केले. त्यानंतर आंदोलकांना महामार्गावरून बाजूला करत महामार्गावरील वाहतूक पूर्ववत केली. आमदार बाबाजी काळे यावेळी म्हणाले , पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प सुमारे 16 हजार कोटी रुपयांचा आहे. मात्र, जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील जागतिक दर्जाच्या 'जीएमआरटी दुर्बिणीला धोका निर्माण होत असल्याचे कारण देत रेल्वे मंत्रालयाने मूळ मार्ग बदलण्याचा निर्णय घेतला.
पुणे-चाकण-राजगुरुनगर-मंचर-नारायणगाव-आळेफाटा-संगमनेर-सिन्नर-नाशिक असा मूळ मार्ग रद्द करून रेल्वे मंत्रालयाने नाशिक-शिर्डी-पुणतांबा आणि अहिल्यानगर-चाकण अशा पर्यायी मार्गाचे सर्वेक्षण केले आहे. या निर्णयामुळे खेड, आंबेगाव, जुन्नर, संगमनेर आणि सिन्नर परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे. मूळ मार्गच कायम राहावा या मागणीसाठी चाकणपासून सिन्नरपर्यंत नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रस्ते अडवले आहेत. आमदार काळे यांनी यावेळी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्र शासनावर सडकून टीका केली. या आंदोलनात भाजप, शिंदे शिवसेना व ठाकरे शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध गावाचे सरपंच, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य मोठ्या संखेने उपस्थित होते.