पुणे: राज्य परीक्षा परिषदेने 23 नोव्हेंबरला घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षेचा निकाल 2 फेबुवारीला जाहीर केला. यामध्ये केवळ 50 हजार 369 उमेदवार पात्र झाले. त्यामुळे या निकालावर अनेक उमेदवारांनी आक्षेप नोंदवला असून, केवळ परीक्षा परिषदेच्या चुकांमुळे अनेक उमेदवार एक किंवा दोन गुणांनी नापास झाले आहेत. याला सर्वस्वी परीक्षा परिषद जबाबदार असून, अनेक प्रश्नांची उत्तरे ही परीक्षा परिषदेकडून चुकलेली आहेत. असे प्रश्न रद्द न करताच निकाल जाहीर करण्यात आला. त्यामुळे राज्य परीक्षा परिषदेने टीईटीचा सुधारित निकाल जाहीर करावा, अन्यथा न्यायालय तसेच शिक्षणमंत्री आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमुळे पुराव्यांसह तक्रार करणार असल्याचे उमेदवारांनी स्पष्ट केले आहे.
राज्यात 4 लाख 46 हजार 730 उमेदवारांनी परीक्षा दिली. तर 28 हजार 939 उमेदवारांनी दांडी मारल्याचे स्पष्ट झाले आहे. तर 50 हजार 369 उमेदवार उत्तीर्ण झाले. तर 3 लाख 96 हजार 325 उमेदवार अनुत्तीर्ण झाले आहेत. 36 उमेदवारांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. एकूण निकाल 11.28 टक्के लागला आहे. त्यामुळे जवळपास चार लाख उमेदवार नापास झाले. यासाठी परीक्षा परिषदेची चुकीची कार्यपद्धती कारणीभूत असून, त्याचा नाहक भुर्दंड बसला असल्याचे उमेदवारांनी स्पष्ट केले आहे.
उमेदवारांनी दिलेल्या माहितीनुसार, पेपर- 2 मधील सामाजिक शास्त्रातील मानसशास्त्राच्या अनेक प्रश्नांची उत्तरे परीक्षा परिषदेने चुकीची दिली आहेत. काही प्रश्न रद्द होण्यासारखे आहेत. पुरोपगामी निरोधन असा प्रकारच नसतो तो पुरोगामी निरोधन असा असायला हवा होता. तसेच चार पर्यायांपैकी चारही उद्योगस्थान मुक्त उद्योग आहेत. वस्त्रोद्योगसुद्धा स्थान मुक्त उद्योग आहे. हिमरस्त्यांचा संदर्भ पाठ्यपुस्तकात कुठेही सापडत नाही. आत्मनिष्ठ घटकातील सहज प्रवृत्ती आत्मप्रतिष्ठा आहे, कुतूहल नाही. शैशव अवस्थेचे वैशिष्ट्य पर्याय क्रमांक तीन व चार आणि अध्यापन प्रतिमान- संबोध साध्यता प्रतिमान हेच उत्तर योग्य आहे हा प्रकार अनेक प्रश्नांच्या बाबतीत झाला आहे.
विशेष करून दुसऱ्या पेपरमधील प्रश्न क्रमांक 66 , 68, 100 आणि 129 क्रमांकाच्या प्रश्नांबाबत अनेक शंका उमेदवारांना आहेत. त्यामुळे याचा खुलासा परीक्षा परीषदेने करणे गरजेचे आहे. जे प्रश्न संदिग्ध किंवा आक्षेपार्ह आहेत ते सर्व प्रश्न रद्द करावेत आणि त्यांचे गुण कमी न करता प्रतिप्रश्न एक याप्रमाणे सरसकट सर्वाना गुण वाढवून द्यावेत. चुकीचे प्रश्न वजा करून शिल्लक राहिलेल्या प्रश्नाच्या संख्येनुसार त्यापैकी मिळालेले एकूण गुण अशा सूत्राचा वापर करून सुधारित निकाल जाहीर करावा जेणेकरून एक किंवा दोन गुणांनी अनुत्तीर्ण उमेदवार उत्तीर्ण होतील, अशी मागणी देखील जोर धरू लागली आहे.
टीईटी, टीएआयटीचा नेमका कुणाला लाभ?
टीईटी परीक्षेच्या माध्यमातून राज्य परीक्षा परिषदेला कोट्यवधी रुपये परीक्षा शुल्काच्या माध्यमातून मिळतात. त्यामुळे परीक्षा पारदर्शी आणि योग्य पद्धतीने बिनचूक पार पाडण्याची जबाबदारी राज्य परीक्षा परिषदेची आहे. परंतु, प्रत्येक परीक्षेत काही ना काही चुका या परीक्षा परिषदेकडून होतात. त्यामुळे चार ते पाच लाख उमेदवारांचे भवितव्य धोक्यात येते. तर दुसरीकडे शिक्षक होण्यासाठी बी.एड् किंवा डी.एड्. झाल्यानंतर टीईटी आणि टीएआयटी अशा दोन परीक्षा उत्तीर्ण होण्याची अट ठेवण्यात आली आहे. एवढ्या परीक्षा एमपीएससी किंवा युपीएससीसाठी देखील नाहीत. त्यामुळे टीईटी आणि टीएआयटी परीक्षेच्या माध्यमातून राज्य परीक्षा परिषदेची तिजोरी ओसंडून वाहत आहे. तर उमेदवारांना मात्र नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याचा गांभीर्याने विचार शिक्षणमंत्री दादा भुसे तसेच प्रशासकीय यंत्रणेने करावा अन्यथा याविरोधात तीव आंदोलन राज्यात उभे करावे लागणार असल्याचा इशारा संबंधित उमेदवारांनी दिला आहे.