पुणे

मंचर : उसाचे पीक जळू लागले; शेतकरी चिंताग्रस्त

अमृता चौगुले

मंचर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्यात सध्या लागवड केलेल्या उसाला मोठ्या प्रमाणावर हुमणी अळीचा प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे. त्यामुळे ऊस जळू लागला असून, शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे. सध्या पावसाचे प्रमाण कमी असल्याने हुमणीचा प्रादुर्भाव वाढल्याचे जाणकार शेतकरी सांगत आहेत. डिंभे धरण तसेच घोड नदीला असणार्‍या बारमाही पाण्यामुळे आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड होते. गेल्या एक ते दीड महिन्यापासून शेतकरी उसाची लागवड करत आहेत.

मात्र, अजूनही या भागात मोठ्या स्वरूपाचा पाऊस झालेला नाही. त्यामुळे जमिनीमध्ये ओलावा कमी आहे. उष्णतेमुळे हुमनी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हुमनी उसाच्या मुळ्या खात असल्याने पीक जळू लागले आहे. परिणामी, शेतकर्‍यांना महागड्या कीटकनाशकांची फवारणी करावी लागत आहे.

मात्र, हुमणी जमिनीच्या खाली राहत असल्याने कीटकनाशकांचा त्या प्रमाणात प्रभाव होत नाही. परिणामी, मोठ्या प्रमाणावर खर्च होत आहे. तरीदेखील हुमनीला आटोक्यात आणण्यात शेतकर्‍यांना यश मिळेनासे झाले आहे. त्यामुळे अनेक शेतकरी ऊस पीक घेऊन वैतागले आहेत. काही शेतकर्‍यांनी तर हा ऊस मोडून टाकला आहे. त्या जागी दुसर्‍या पिकांची लागवड करू लागले आहेत. हुमणीचा वाढलेला प्रादुर्भाव हा शेतकर्‍यांसाठी डोकेदुखी ठरत असून, एकूणच भांडवली खर्चात कीटकनाशक फवारणीमुळे वाढ झाली आहे, असे पिंपळगाव खडकी येथील शेतकरी ज्ञानेश्वर पोखरकर यांनी सांगितले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT