पेठ(पुणे); पुढारी वृत्तसेवा : सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागात पावसाने ताण दिल्याने येथील शेतकर्यांची बटाटा पीक वाचविण्यासाठी धडपड सुरू आहे. बटाटा पिकात ठिबक सिंचनचे पाइप जोडण्यासाठी शेतकर्यांची लगबग सुरू आहे.
सातगाव पठार भागात बटाट्याची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली आहे. या आधी झालेल्या पावसाने बटाटे तरारले. त्यानंतर पावसाने ताण दिल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून ते पिकाला देण्याची धडपड शेतकरी करीत आहेत.
कुरवंडी, कोल्हारवाडी, भावडी, कारेगाव भागांत बटाटा पीक जोमात आहे. परंतु,पाऊस लांबणीवर पडल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. बटाटा पिकासाठी एकरी पन्नास ते साठ हजार खर्च येतो. मशागतीवरील खर्च वाया जाऊ नये यासाठी शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत, असे शेतकरी सोपानराव नवले व गोरक्षनाथ नवले यांनी सांगितले. सध्या फवारणी, खत टाकणे ही कामे सुरू आहेत. खुरपणीची कामे सुरू आहे, अशी माहिती शेतकरी विशाल कराळे, वसंतराव एरंडे यांनी दिली.
हेही वाचा