सोमेश्वरनगर: केंद्र शासनाने 2026-27 गळीत हंगामासाठी 10.25 टक्के साखर उताऱ्यासाठी प्रतिटन 3650 रुपये आणि त्यापुढील प्रत्येक टक्क्यासाठी 365 रुपये असा रास्त आणि किफायतशीर दर (एफआरपी) जाहीर केला आहे. मात्र, साखरेच्या किमान विक्री किमतीत (एमएसपी) गेल्या सात वर्षांत कोणतीही भरीव वाढ न झाल्याने सहकारी साखर उद्योगातून चिंता व्यक्त केली जात आहे. साखर कारखान्यांचे अर्थकारण मजबूत करण्यासाठी एमएसपीमध्ये तातडीने वाढ करण्याची गरज साखर उद्योगातून व्यक्त होत आहे.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक ऋषिकेश शिवाजीराव गायकवाड यांनी याबाबत भूमिका मांडताना सांगितले की, केंद्र शासनाने 2019 मध्ये एमएसपीत वाढ केली होती. त्या वेळी साखरेचा किमान विक्री दर 2900 रुपयांवरून 3100 रुपये प्रतिक्विंटल करण्यात आला. त्यानंतर आजतागायत एसएसपीमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. दुसरीकडे एफआरपी मात्र सातत्याने वाढत असल्याने साखर उद्योगावर आर्थिक ताण वाढत चालला आहे.
गायकवाड यांनी सांगितले की, 2009-10 मध्ये 9.5 टक्के उताऱ्यासाठी प्रतिटन 1298 रुपये एफआरपी होती. त्याचवेळी साखरेचा एमएसपी 2596 रुपये प्रति क्विंटल होता. आता 2026-27 साठी एफआरपी 3650 रुपयांपर्यंत पोहोचली आहे, म्हणजेच मागील 17 वर्षांत एफआरपी मध्ये प्रतिटन 2352 रुपयांची वाढ झाली आहे.
मात्र, एमएसपीत केवळ 504 रुपयांची वाढ झाली असून तो अजूनही 3100 रुपयांवरच स्थिर आहे. त्यामुळे एफआरपीच्या तुलनेत एमएसपी वाढ अत्यंत कमी आहे. एमएसपी पेक्षा एफआरपी तब्बल 550 रुपयांनी अधिक आहे. ऊस उत्पादन खर्चात मोठी वाढ झालेली असताना साखरेच्या एमएसपी मध्ये वाढ न झाल्याने साखर कारखान्यांचे आर्थिक गणित कोलमडत आहे. केंद्र शासनाने यंदाची एफआरपी ठरवताना उसाचा प्रतिटन उत्पादन खर्च 1820 रुपये गृहीत धरल्याचे स्पष्ट केले आहे.
मात्र, खत, मजुरी, वीज, सिंचन आणि वाहतूक खर्चात मोठी वाढ झाल्याने प्रत्यक्ष उत्पादन खर्च यापेक्षा जास्त असल्याचे साखर उद्योगाचे मत आहे. दरम्यान, मागील दोन-तीन वर्षांपासून साखरेचे बाजारभाव एमएसपीच्या आसपासच राहिले आहेत. हंगामाच्या सुरुवातीला असलेले दर वर्षभर स्थिर राहत नसल्याने साखर कारखान्यांच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांना एफआरपी देण्यावर होत असल्याने अनेक कारखान्यांना शेतकऱ्यांची थकबाकी देणेही अवघड बनत आहे.
केंद्र सरकारने एमएसपीमध्ये भरीव वाढ केल्यास साखर कारखान्यांना आर्थिक स्थैर्य मिळेल. त्याचबरोबर शेतकऱ्यांनाही अधिक दर देणे शक्य होईल.ऋषीकेश गायकवाड, संचालक, सोमेश्वर सहकारी साखर कारखाना