पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने यंदा घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेत सरसकट सर्व कर्मचाऱ्यांची एका परीक्षा केंद्रावरून जवळच्या दुसऱ्या परीक्षा केंद्रावर बदली करण्याचा निर्णय घेतला होता.
परंतु यामध्ये आता बदल करण्यात आला असून, ज्या परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, अशा कर्मचाऱ्यांची बदली न करता केवळ ज्या परीक्षा केंद्रांवर कॅमेरे नाहीत अशाच कर्मचाऱ्यांची बदली करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी दिलेल्या निर्देशानुसार, फेबुवारी-मार्च 2026 दहावी-बारावी परीक्षेत कॉपीमुक्त अभियान राबविण्यासंदर्भात शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी एक बैठक आयोजित केली होती.
या बैठकीमध्ये दिलेल्या निर्देशानुसार, परीक्षेसाठी निश्चित्त केलेल्या सर्व केंद्रांवर परीक्षा पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी ज्या माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी ज्या परीक्षा केंद्रावर प्रवीष्ट होणार आहेत. त्या परीक्षा केंद्रांसाठी केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती संबंधित केंद्राव्यतिरिक्त इतर अन्य माध्यमिक विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांमधून करण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी, असे कळविण्यात आले होते. परंतु यामध्ये आता बदल करण्यात आला आहे.
सुधारित बदलांच्या अनुषंगाने शासनाने दिलेल्या निर्देशानुसार, विभागीय मंडळांतर्गत सर्व परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्यांची अदलाबदल न करता ज्या परीक्षा केंद्राबर सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध होणार नाहीत, अशा परीक्षा केंद्रावरील सर्व कर्मचाऱ्यांची अदलाबदल करण्यात यावी. संबंधित बदलांच्या अनुषंगाने फेबुवारी-मार्च 2026 परीक्षेसाठी योग्य नियोजन करून कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य मंडळास सादर करावा, असे देखील डॉ. माळी यांनी स्पष्ट केले आहे.