Law Pudhari
पुणे

Pune Damodar Sahu 420 Case: ‘सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया सोसायटी’चे अध्यक्ष दामोदर साहू 420 प्रकरणात सहआरोपी

पुणे सत्र न्यायालयात 5 मार्चपासून सुनावणी; आर्थिक हेराफेरी प्रकरणात आरोपपत्र दाखल

पुढारी वृत्तसेवा

पुणे: ‌‘सर्व्हन्ट्‌‍स ऑफ इंडिया सोसायटी‌’ला स्थापन होऊन 121 वर्षे पूर्ण होत असताना इतिहासात पहिल्यांदा या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष दामोदर साहू यांना वयाच्या 80व्या वर्षी भारतीय दंड संहितेच्या कलम 420 अंतर्गत फसवेगिरी, दस्तऐवजाची हेराफेरी प्रकरणात सहआरोपी म्हणून न्यायालयासमोर हजर होण्याची वेळ आली आहे. 5 मार्च 2026 रोजी या प्रकरणावर पुणे सत्र न्यायालयात सुनावणी सुरू होणार आहे.

गोखले इन्स्टिट्यूटकडून लाखो रुपये परस्पर वळवून हेराफेरी केल्याप्रकरणी पदच्युत सचिव मिलिंद देशमुख यांना एप्रिल 2025 मध्ये पोलिस कोठडी झाली होती. त्या प्रकरणाचा तपास डेक्कन पोलिस ठाण्याच्या निरीक्षक गिरिजा निंबाळकर यांनी अत्यंत प्रामाणिक, शिस्तबद्ध पद्धतीने तपास केल्याने करून संस्थेचे अध्यक्ष दामोदर साहू यांच्या सहमतीनेच देशमुख ही सर्व हेराफेरी करीत असल्याचे तपासात आढळून आले. त्यामुळे दामोदर साहू यांना प्रकरणात सहआरोपी म्हणून आरोपपत्र पुणे सत्र न्यायालयात नुकतेच दाखल करण्यात आले आहे.

दामोदर साहूबद्दल राष्ट्रपतींना पत्र

संस्थेच्या इतिहासात पहिल्यांदा अध्यक्षपदावरील व्यक्तीला न्यायालयासमोर उपस्थितीत राहावे लागत असल्याने संस्थेच्या प्रतिष्ठेला काळीमा फासला जात असल्याची चर्चा संस्थेत सुरू आहे. उपाध्यक्ष आत्मानंद मिश्रा यांच्या निधनानंतर संस्थेचे आजीवन सदस्य प्रवीणकुमार राऊत यांनी प्रकरणाचे सर्व पुरावे गोळा करून संस्थेला वाचवण्यासाठी उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी दर्शवली आहे. 1995 मध्ये महिला व बालकल्याण कार्यासाठी संस्थेचे सदस्य म्हणून तत्कालीन राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा यांच्या हस्ते संस्थेला पुरस्कार मिळाला होता. तो पुरस्कार दामोदर साहू यांनी स्वीकारला होता. मात्र, त्याच पुरस्काराचा अवमान दामोदर साहू यांनी केला असल्याने तो पुरस्कार परत घ्यावा, अशी विनंती करणारे पत्र विद्यमान राष्ट्रपती यांना राऊत यांनी पाठवले आहे.

तब्बल चार वर्षांचा लढा

मिलिंद देशमुख व दामोदर साहू यांनी ‌‘सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया सोसायटी‌’मध्ये स्वतःच्या मुलांना प्रवेश देण्यासाठी प्रेमकुमार द्विवेदी या 86 वर्षांच्या ज्येष्ठ सदस्याला परस्पर जमीन विकण्याकामी संगनमत केले होते. त्याबदल्यात द्विवेदीच्या नातवाला संस्थेत प्रवेश दिला आहे. त्यासाठी संस्थेत कोट्यवधी रुपयांचे घोटाळे करण्यात आल्याचे आरोप झाले. त्यांची चौकशी होऊन मिलिंद देशमुखला अटक झाली होती. मात्र, त्यांचे साथीदार दस्तूरखुद्द अध्यक्ष दामोदर साहू बचावले होते. चार वर्षांच्या लढ्यानंतर साहू यांच्यावर प्रथमच आरोपत्र दाखल झाले आहे.

दिवंगत उपाध्यक्ष आत्मानंद मिश्रा यांचा लढा

संस्थेचे उपाध्यक्ष दिवंगत आत्मानंद मिश्रा यांनी वारंवार या प्रकरणात आक्षेप घेतले होते; परंतु त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला. ते अनेक वेळा उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून थेट रेल्वेने डेक्कन पोलिस ठाण्यात येऊन त्यांचे जबाब नोंदवत असत. मात्र, डिसेंबर 2025 मध्ये त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने अचानक निधन झाले. मृत्यूपूर्वी त्यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात येऊन आपला जबाब नोंदवला होता, ज्यामध्ये देशमुख यांनी रानडे चॅरिटेबल ट्रस्टची सोळा एकर जमीन स्वतःचे नावे करण्यासाठी संस्थेचे दस्तऐवज परस्पर वापरले होते. त्या प्रकरणात देशमुख यांनी स्वतःचा मेहुणा सागर काळे व शिवाजी धनकवडे यांना सामील करण्याचा प्रयत्न केला. अशी सर्व प्रकरणे देशमुख अध्यक्षाच्या मूक संमतीने करीत असल्याचे समोर आले. या प्रकरणात दामोदर साहू डोळे बंद करून संस्थेच्या चेकबुकावर स्वाक्षरी करून आर्थिक नियंत्रण समितीलासुद्धा केराची टोपली दाखवत आहेत, असा आरोप आर्थिक नियंत्रण समितीचे सदस्य करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT