अमृत भांडवलकर
सासवड: शहराच्या वाढत्या नागरीकरणासोबत नागरिकांच्या आरोग्यदायी जीवनशैलीत सार्वजनिक उद्यानांची भूमिका महत्त्वाची ठरते. सासवड शहरात एकूण सहा सार्वजनिक उद्याने असली, तरी त्यापैकी दोन महत्त्वाची उद्याने गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि सकाळ-सायंकाळ फिरण्यासाठी उद्यानांवर अवलंबून असलेल्या नागरिकांची गैरसोय होत आहे.
सध्या शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, सोपाननगरमधील नाना-नानी पार्क, राणी लक्ष्मीबाई उद्यान आणि गणेशबाग ही चार उद्याने नागरिकांसाठी खुली असून, त्यांचा नियमित वापर होत आहे. यापैकी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात स्वच्छता, देखभाल आणि सुरक्षेची विशेष काळजी घेतली जात असल्याचे दिसून येते. उद्यान परिसर स्वच्छ ठेवण्यात आला असून, सुरक्षा रक्षकांचीही नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे या उद्यानाचा लाभ दररोज मोठ्या संख्येने नागरिक घेत आहेत.
मात्र, राजमाता जिजाऊ उद्यान आणि आचार्य अत्रे उद्यान ही दोन्ही उद्याने देखभाल व दुरुस्तीअभावी बंद आहेत. या उद्यानांच्या बंद अवस्थेमुळे परिसरातील मुलांना खेळण्यासाठी तसेच नागरिकांना विरंगुळ्यासाठी उपलब्ध असलेल्या सार्वजनिक जागा कमी पडत आहेत. उद्यानांचे दरवाजे बंद असल्याने अनेकांना निराश होऊन परत जावे लागत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
शहरातील वाढती लोकसंख्या आणि खुल्या जागांची घटती उपलब्धता लक्षात घेता उद्यानांचे महत्त्व अधिक वाढले आहे. त्यामुळे बंद असलेल्या उद्यानांची तातडीने दुरुस्ती करून ती नागरिकांसाठी खुली करावीत, अशी मागणी जोर धरत आहे. सध्या मुलांना खेळण्यासाठी आणि कुटुंबीयांना विरंगुळ्यासाठी वाघ डोंगर परिसरातील वन विभागाच्या उद्यानाचा आधार घ्यावा लागत आहे.
मात्र, शहरातील सर्व भागांतील नागरिकांसाठी हा पर्याय सोयीचा ठरत नाही. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने आवश्यक निधी व मनुष्यबळ उपलब्ध करून बंद उद्याने लवकर सुरू करावीत, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. सार्वजनिक उद्याने ही केवळ मनोरंजनाची ठिकाणे नसून सामाजिक संवाद, आरोग्यसंवर्धन आणि पर्यावरणसंतुलनाची केंद्र आहेत. त्यामुळे शहरातील सर्व उद्याने सुस्थितीत व कार्यरत ठेवणे ही प्रशासनाची जबाबदारी असून, बंद पडलेल्या उद्यानांच्या पुनरुज्जीवनाकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.