समीर भुजबळ
वाल्हे: अभंगांचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि विठ्ठलनामाच्या अखंड जयघोषात श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा मंगळवारी (दि. १४) आद्य रामायणकार महर्षी वाल्मीकी ऋषींच्या वाल्हे नगरीत (ता. पुरंदर) मुक्कामासाठी विसावला. लाखो वैष्णवांच्या उपस्थितीने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला.
जेजुरीतील मुक्कामानंतर पहाटे सहाच्या सुमारास पालखी सोहळा वाल्हेकडे मार्गस्थ झाला. सकाळी अकराच्या सुमारास दौंडज ग्रामस्थांनी सोहळ्याचे स्वागत केले. त्यानंतर दुपारी सव्वाबाराच्या सुमारास नगारखान्यासह पालखी सोहळा वाल्हेच्या वेशीवर दाखल झाला. ग्रामस्थांच्या स्वागतानंतर पालखी मुक्कामस्थळाकडे रवाना झाली.
स्वागतस्थळापासून अवघ्या अडीच किलोमीटरवरील पालखीतळावर पोहोचण्यासाठी मात्र सव्वा तास लागला. रेल्वेच्या भुयारी मार्गात वाहनांची आणि वैष्णवांची मोठी गर्दी झाल्याने काही काळ वाहतूक संथ झाली. पालखीतळावर पोहोचल्यानंतर पालखी रथातून उतरवून ग्रामस्थांच्या खांद्यावर घेण्यात आली. भाविकांनी पालखी नाचवत विसाव्याला प्रदक्षिणा घातली.
चोपदारांच्या सूचनेनंतर वैष्णवांच्या उपस्थितीत समाजआरती झाली. त्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास पालखी सोहळा मुक्कामासाठी विसावला. भाविकांनी दुतर्फा रांगा लावत माउलींच्या पादुकांचे दर्शन घेतले. या वेळी प्रमुख विश्वस्त राजेंद्र उमाप, पालखी सोहळा प्रमुख भावार्थ देखणे, योगी निरंजन नाथ, कबीर महाराज, ॲड. रोहिणी पवार, बाळासाहेब चोपदार, उद्धव चोपदार, राजाभाऊ चोपदार, श्रीमंत ऊर्जितसिंह शितोळे सरकार, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, जिल्हा परिषद सदस्या डॉ. प्राजक्ता दुर्गाडे, सरपंच अतुल गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम रजपूत, प्रभारी गटविकास अधिकारी अनिवाश थोरात, जेजुरीचे पोलिस निरीक्षक रवींद्र पाटील, सहायक पोलिस उपनिरीक्षक केशव जगताप, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विक्रम काळे, मंडल अधिकारी प्रमोद झुरंगे, विस्तार अधिकारी बबनराव चखाले, ग्रामविकास अधिकारी जयेंद्र सुळ, तलाठी सागर पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
माळवाडी येथे दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, उद्योजक दत्तात्रय हरिभाऊ बावळेकर, माया चॅरिटेबल फाउंडेशन आणि पुणे, पिंपरी-चिंचवड अग्रवाल परिवार यांच्या वतीने अन्नदानाची व्यवस्था करण्यात आली होती. वाल्हे येथील गीतांजली भुजबळ यांच्या माध्यमातून पिण्याच्या स्वच्छ पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
अमर तरुण मंडळ, प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे मित्रपरिवार, उद्योजक गोरख कदम, भाजपचे ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष सचिन लंबाते, क्रांतिसूर्य समता विकास प्रतिष्ठान, आदर्श सामाजिक फाउंडेशन, पै. संदीप मोडक तसेच अमित पवार मित्रपरिवार यांच्या वतीने अन्नप्रसाद सेवा देण्यात आली. ग्रामपंचायतीने पाण्याचे टँकर, अंघोळीची व्यवस्था केली, तर आरोग्य विभागाने वैष्णवांना आरोग्यसेवा पुरविली.