बापू जाधव
निमोणे: गावोगावी वयाची पंचविशी ते अडतिशी ओलांडूनही अनेक मुले-मुली विवाहाच्या प्रतीक्षेत आहेत. रोजगार, शेती किंवा आर्थिक स्थैर्य असतानाही बदलत्या काळानुसार वधू-वरांच्या तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या अपेक्षा बदलल्याने विवाह जुळवणे अवघड झाले आहे. त्यामुळे योग्य स्थळ शोधून देणाऱ्या मध्यस्थांना सध्या विशेष महत्त्व आले असून, लग्न जमवण्याच्या या 'व्यवसायाला' चांगलीच मागणी वाढल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.
'पोरींची काळजी करू नका. सतरा-अठरा स्थळे माझ्या जवळ आहेत; मात्र धागा-दोरा जुळून आला पाहिजे. उगाच कुठेही पदर लावून खानदानाला बट्टा लावून घ्यायचा नाही. तुमची सगळी कुंडली माझ्याकडे आहे. नात्यागोत्याच्या बाबतीत तुम्ही उजवी मंडळी आहात. लई घाई करून चुकीचे काही घडायला नको, म्हणून मी ताकही फुंकून पितोय...' असे सांगत लग्न जमवणारा एक मध्यस्थ पाहुणा एका दमात आपले महत्त्व पटवून देतो. मात्र, दुसरीकडे 'धागा-दोरा जुळण्याच्या' नादात मुलाचे वय वाढत चालले असून, संसार करण्याची तयारी असलेली मुलगी मिळत असेल तर फार ताणून धरण्यात अर्थ नाही, अशी मानसिकता मुलाच्या कुटुंबीयांमध्येही तयार होत आहे.
पूर्वी विवाहासाठी पारंपरिक चालीरीती, नातेसंबंध आणि कुटुंबाची प्रतिष्ठा यांना मोठे महत्त्व दिले जात होते. मात्र, आता काळाची पावले ओळखून अनेक पालक जुन्या चौकटी बाजूला ठेवत मुलाचे किंवा मुलीचे लग्न लवकर व्हावे, या भूमिकेकडे वळले आहेत. परिणामी, दोन्ही कुटुंबांमधील संवाद घडवून आणणाऱ्या मध्यस्थांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे.
'आमच्या घरात येणाऱ्या सुनेला आम्ही लेकीसारखे ठेवू. घरात कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही,' याची खात्री मध्यस्थामार्फत वधुपित्याला पटवून देण्यासाठी मुलाकडील मंडळी प्रयत्नशील असतात. त्यामुळे मध्यस्थ घरी आला की त्याच्या पाहुणचारात कसूर होऊ नये, याचीही विशेष काळजी घेतली जाते. त्याच्या प्रवासापासून खाण्या-पिण्यापर्यंत आणि विश्रांतीची व्यवस्था करण्यापर्यंत मुलाकडील मंडळी लक्ष देताना दिसतात.
रखडलेली लग्नाळू मुले हा आई-वडिलांच्या जिव्हाळ्याचा आणि चिंतेचा विषय असतो. ही मानसिकता अचूक हेरून मध्यस्थ विविध गावांमधील मुलींचे बायोडाटा आणून मुलाकडील कुटुंबीयांना दाखवतात. 'हे स्थळ जवळपास पक्के करण्याची जबाबदारी माझी,' अशी हमी देत काही मध्यस्थ आपला प्रभाव वाढविण्याचा प्रयत्न करतात. मात्र, मुलीकडील कुटुंबाच्या अपेक्षा, मुलीची पसंती आणि दोन्ही बाजूंच्या विचारांचा ताळमेळ साधणे, हीच खरी कसोटी ठरते.
लग्न जुळविण्याच्या मध्यस्थांनी आत्तापर्यंत किती विवाह जमवले, हा संशोधनाचा विषय असला, तरी विवाहासाठी इच्छुक कुटुंबांमध्ये त्यांचे वाढलेले महत्त्व नाकारता येत नाही. बदलत्या सामाजिक परिस्थितीत पारंपरिक स्थळशोधापासून बायोडाटा, नातेवाइकांचे संदर्भ आणि थेट कुटुंबीयांच्या भेटीगाठींपर्यंत मध्यस्थांची भूमिका विस्तारली आहे.
मध्यस्थांची भूमिका का वाढली?
वधू-वरांच्या बदललेल्या अपेक्षा.
मुलांचे वाढते वय आणि रखडलेले विवाह.
रोजगार व आर्थिक स्थैर्य असूनही स्थळ न जुळणे.
नातेसंबंधांची बदललेली व्याप्ती.
योग्य स्थळाचा शोध घेण्यासाठी पालकांचा वाढता आधार.
दोन्ही कुटुंबांमध्ये संवाद घडवून आणण्याची गरज.