प्रसाद जगताप
पुणे: वेळ सायंकाळी सहाची... एक रुग्णवाहिका रुबी, जहांगीर रुग्णालयाकडून जोरात सायरन वाजवत आली अन् राजा बहादुर मिल रस्त्यावर रेल्वे डीआरएम कार्यालयासमोर, रेल्वे अधिकारी क्वार्टरसमोर अन् आरटीओ मेट्रोस्थानकाखाली थांबली, ती थांबली येथील रस्त्यावरील प्रचंड वाहतूक कोंडीने... ही घटना होती, शुक्रवारची (दि.27). मात्र, येथे अशी स्थिती दररोज सकाळी व सायंकाळी ‘पिक अवर्स’मध्ये असते. अशा भीषण कोंडीने अनेक रुग्णांना ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार पुरवताना मोठे अडथळे येतात. त्यामुळे पुणे शहर विभागीय आयुक्त, मनपा आयुक्त, पोलिस आयुक्त, जिल्हाधिकारी साहेब या कोंडीकडे लक्ष देऊन आमची सुटका करा, अशी मागणी पुणेकरांकडून केली जात आहे.
राजा बहादुर मिल रस्त्यावरील वाहतूक कोंडीने पुणेकर वाहनचालक प्रचंड वैतागले आहेत. खासकरून आरटीओ कार्यालयासमोरील मंगळवार पेठ मेट्रोस्थानकाखाली तर वाहनचालकांचा अक्षरश: कोंडीने श्वास गुदमरतो. येथील कोंडीमुळे वाहनचालकांना नाईलाजास्तव पादचारी मार्गावर गाड्या चढवून जावे लागत आहे. अशी स्थिती असतानाही वाहतूक पोलिसांसह प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
नुकत्याच झालेल्या पुणे महानगर परिवहन एकीकृत प्राधिकरणाच्या बैठकीत विभागीय आयुक्तांनी जास्त कोंडी असलेल्या मार्गांना प्राधान्य देत येथील कोंडी सोडवण्याचे आवाहन केले आहे. यात त्यांनी काही मार्गांचीही निवड केली आहे. त्यामध्ये राजा बहादुर मिल रस्त्याचाही सहभाग करावा आणि तेथील कोंडीवर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही वाहनचालकांकडून होत आहे. यासंदर्भात वाहतूक पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांच्याशी संपर्क साधला असता, होऊ शकला नाही.
काय आहेत समस्या?
पुणे रेल्वेस्थानक, विमानतळाकडे जाणारा रस्ता असल्याने प्रचंड वाहनांची वर्दळ.
वाहनांच्या प्रचंड वर्दळीमुळे रस्ता अपुरा पडत आहे.
मंगळवार पेठ मेट्रोस्थानकाखालचे प्रचंड मोठे पदपथ.
वाहनांची वाढती संख्या, या भागात वाहतूक नियोजनाचा अभाव.
या भागात मेट्रो झाल्यामुळे उड्डाणपूल करणे अशक्य.
...तर उपाय काय?
बाजूलाच असलेली रेल्वेची जागा ताब्यात घेणे.
या रेल्वेच्या जागेत रस्तारुंदीकरण करून मोठा करणे.
मंगळवार पेठ मेट्रोस्थानकाखाली असलेले रुंद पदपथ कमी करणे.
तसेच पुणे विमानतळ रेल्वेस्थानकाकडे जाण्यासाठी अतिरिक्त रस्त्यांची निर्मिती करणे.
अतिरिक्त रस्ते झाल्यामुळे या रस्त्यावरील वाहनांचा काहीसा ताण कमी होईल.
राजा बहादुर मिल रस्त्यावर रुबी हॉलसमोरून जाताना अक्षरश: वैताग येतो. येथील वाहतूक कोंडी पाहूनच श्वास गुदमरतो. आरटीओ मेट्रोस्थानकाखाली तर विनाकारण पदपथ प्रमाणापेक्षा मोठे करून ठेवले आहेत. त्या भागात खूप त्रास होतो. पोलिस आयुक्तांनी येथे लक्ष देऊन वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात. खास करून ते मेट्रोस्थानकाखालचे प्रमाणापेक्षा मोठे पादचारी मार्ग कमी करावेत.सोमनाथ रोकडे, वाहनचालक
कामानिमित्त या रस्त्याने सातत्याने ये-जा करत असतो. या मार्गावर खासकरून रेल्वे मुख्यालयासमोर आल्यावर मला दुचाकीवर असून देखील वाहतूक कोंडीचा खूप सामना करावा लागतो. बऱ्याचदा येथील कोंडीत रुग्णवाहिका देखील अडकलेल्या दिसतात. या मार्गावर सर्वाधिक कोंडीचा त्रास मंगळवार पेठ मेट्रोस्थानकाखाली होत आहे.आनंद पाठक, वाहनचालक