सासवड: पुरंदरच्या पश्चिम भागात दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम अक्षरशः संकटात आला आहे. गराडे परिसरात पावसाअभावी सोयाबीन, भुईमूग आणि वाटाणा पिकांची वाढ खुंटली. अनेक ठिकाणी पिके करपली आहेत. उत्पादनाची आशा मावळल्याने काही शेतकऱ्यांनी उभ्या सोयाबीन पिकावरच ट्रॅक्टर फिरवण्यास सुरुवात केली आहे.
गराडे येथील शेतकरी सुनील बबन जगदाळे यांनी एक एकर क्षेत्रात घेतलेल्या सोयाबीन पिकावर शुक्रवारी (दि. १९) ट्रॅक्टर फिरवला. बियाणे, खत, औषधांची फवारणी, मशागत आणि मजुरीवर खर्च करून उभे केलेले पीक डोळ्यांसमोर नष्ट करण्याची वेळ आल्याने शेतकऱ्यांची हतबलता या घटनेतून स्पष्ट होत आहे. पावसाअभावी पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धताही कमी होत आहे.
त्यामुळे आगामी काळात चारा व पाणीटंचाईचे संकट अधिक तीव्र होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. सोयाबीन पिकाच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पावसाची नितांत गरज असते. मात्र, याच काळात पावसाने पाठ फिरवल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. काही ठिकाणी झाडे सुकून गेली आहेत. दाणे भरण्याची प्रक्रियाही प्रभावित झाली आहे. भुईमूग व वाटाणा पिकांची परिस्थितीही चिंताजनक आहे. यामुळे खरीप हंगामातील उत्पन्नावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर हातातोंडाशी आलेला घास मातीत मिसळत असल्याचे चित्र आहे.
खर्च झाला; पण उत्पादन नाही
पिकांच्या पेरणीपासून मशागतीपर्यंत शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला. बियाणे, रासायनिक खते, औषधे, फवारणी, मजुरीसाठी पैसा खर्च करूनही आता उत्पादनाची खात्री राहिलेली नाही. त्यामुळे एकीकडे पिकांचे नुकसान आणि दुसरीकडे वाढता उत्पादन खर्च, अशा अस्मानी आणि आर्थिक दुहेरी संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे.
शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा
पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करावेत. परिस्थितीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करावे आणि बाधित शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी, अशी मागणी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांकडून होत आहे. पावसाची प्रतीक्षा करीत असलेल्या शेतकऱ्यांना आता प्रशासनाच्या मदतीचा आधार मिळण्याची अपेक्षा आहे.
पावसाने दोन महिन्यांपासून दडी मारल्याने हातातोंडाशी आलेला घास मातीत मिसळला आहे. सोयाबीनचे पीक वाचण्याची शक्यता नसल्याने नाइलाजाने ट्रॅक्टर फिरवावा लागला. पशुधनासाठी चाराही उपलब्ध होत नसल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत.सुनील जगदाळे, शेतकरी, गराडे